नवी दिल्ली: राहुल गांधी यांनी काश्मीरात येऊन येथील स्थितीची पहाणी करावी असे खुले निमंत्रण जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले होते, ते त्यांनी स्वीकारल्यानंतर राज्यपालांनी त्याला फाटे फोडून त्याविषयी टाळाटाळ चालवली आहे. राहुल गांधी यांना एकट्यांना मी निमंत्रण दिले होते पण त्यांनी आता त्यासाठी अनेक अटी घातल्या असल्याचा दावा राज्यपालांनी केला होता. पण त्यालाही आता राहुल गांधी यांनी प्रतिसाद देत राज्यपालांचीच पंचाईत करून ठेवली आहे.
आज राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की मी कोणतीही पुर्व अट न घालता काश्मीरला येऊ इच्छितो, कधी येऊ ते सांगा असा संदेश त्यांनी राज्यपालांना उद्देशून पाठवला आहे. मी तुमचे निमंत्रण स्वीकारले आहे. काश्मीरला येऊन तेथील लोकांशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी माझी कोणतीही अट नाही, आता कधी येऊ तेवढे सांगा असे राहुल यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
दरम्यान राहुल गांधी यांची विनंती राज्यपालांनी स्थानिक पोलिस आणि प्रशासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवली आहे असे श्रीनगरातील राजभवनातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या निमंत्रणाबाबत राज्यपालांनी आता आपला शब्द पाळावा कोणतीही टाळाटाळ करू नये असे कॉंग्रेसने म्हटले आहे.