नवी दिल्ली: प्रत्यक्ष काश्मीरात येऊन येथील स्थिती पहाण्याचे जाहीर निमंत्रण काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले होते. ते निमंत्रण राहुल गांधी यांनी स्वीकारल्यानंतर आता राज्यपालांनी त्याला फाटे फोडून टाळाटाळ चालवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे राहुूल गांधी यांना देण्यात आलेले निमंत्रण प्रामाणिक किंवा गांभीर्याचे नव्हतेच अशी प्रतिक्रीया ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की सरकारी प्रचार पद्धतीचा भाग म्हणूनच केवळ त्यांनी हे तोंडदेखले निमंत्रण दिले होते.
राहुल गांधी यांनी काश्मीर भेटीसाठी अटी ठेवल्या होत्या असे राज्यपालांचे म्हणणे आहे पण एखाद्या राज्यात भेटीसाठी आलेल्या पाहुण्याला तेथील लोकांना भेटण्याचे स्वातंत्र्य असत नाही का असा सवाल चिदंबरम यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे. आता राज्यापालांनी आपला शब्द पाळला पाहिजे असेही कॉंग्रेसच्यावतीने सांगण्यात आले आहे.