तालुक्यातील दक्षिण पूर्व भागातील स्थिती
– राहुल शिंदे
नीरा – राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती असली तरी पुरंदरच्या दक्षिण पूर्व भागातील अनेक गावांतील लोक पिण्याच्या पाण्यासाठी आजही टॅंकरवर अवलंबून आहेत. तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना सात टॅंकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.
पुरंदर तालुक्यात एका बाजूला नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे तर पुरंदरच्या अगदी मध्यभागी असलेल्या कऱ्हा नदीला ही पूर आला आहे. त्यामुळे जेजुरीचे नाझरे धरण भरले आहे. पुरंदरच्या पश्चिमेकडील डोंगर रांगेत जोरदार पाऊस झाला आहे आणि अजूनही पडतो आहे. मात्र, पुरंदरच्या पूर्व भागात भागातील पिसर्वे, नायगाव, राजुरी, रिसे, पिसे, नावळी, राख कर्नलवाडी या प्रमुख गावांसह जवळजवळ अर्धा पुरंदर आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच राहिला आहे.
नाले आणि विहिरींना पाणी वाढले नाही. त्यामुळे आजही पुरंदरमधील या भागामध्ये सात टॅंकरच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यांवर पाणी पुरवले जात आहे. येथील भाग अजूनही आवर्षणग्रस्त असल्याचे दिसत आहे. अजून आठ-दहा दिवस पाऊस पडला नाही तर या भागातील लोकांना आत्तापासूनच दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.
याबाबतची पाहणी करण्यासाठी एक प्रशासकीय कमिटी पुरंदरमध्ये आली होती. त्यांचा अहवाल आल्यानंतर शासकीय पुढील नियोजन होणार आहे. नीरा नदीपासून दहा किमी अंतरावर असलेले राख, कर्नलवाडी, गुळूंचे या ठिकाणचे सर्व ओढे-नाले आजही कोरडेच आहेत. या भागातील लोकांनाही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. मात्र, या भागातील अद्याप पाऊस पडला नाही.
तालुक्याच्या पश्चिमेकडील डोंगरी भागात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे. मात्र, पुरंदरच्या पूर्वेकडील सखल भागात पावसाचे प्रमाण नगण्य आहे. या गावातील गावठाणामध्ये पाणी आले असले तरी वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई आहे. त्यामुळे सद्य स्थितीत पुरंदरमध्ये सात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यात या ठिकाणी पाऊस न झाल्यास टंचाई वाढण्याची शक्यता आहे.
– बाळासाहेब सानप, पाणीपुरवठा अधिकारी, पुरंदर