अकोले – विधानसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार देऊन आगामी काळात खरा आदिवासी आमदार तालुक्याला दिला जाईल, असा निर्धार भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी व्यक्त केला.
आदिवासी क्रांती दिनाचे औचित्य साधून आज अकोले शहरात आदिवासी बांधवांनी रॅली काढली होती. या रॅलीमध्ये अकोलेकरांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध कार्यक्रम सादर केले. बाजारतळापासून सुरू झालेली ही जोरकस रॅली पुन्हा अकोले बाजार तळावर आली. या रॅलीत प्रामुख्याने आदिवासी युवक, पुरुष, महिला सहभागी झाल्या होत्या.
यानिमित्ताने अशोकराव भांगरे यांनी आपल्या राजकीय ताकदीचे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर तेथे जाहीर सभा झाली. तेव्हा भर पावसात आदिवासी व इतर उपस्थित बसून होते. यावेळी अकोले तालुका पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ, उपसभापती मारुती मेंगाळ, जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे, जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे, शिवसेनेचे युवा नेते सतीश भांगरे, शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, माजी उपसभापती यमाजी लहामटे, युवा नेते अमित भांगरे, माजी शिक्षण विस्ताराधिकारी एम. एम. लांघी आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यामध्ये कोट्यवधींचा निधी येतो. मग तो जातो कुठे ? असा सवाल भांगरे म्हणाले, आदिवासी समाजात घुसखोरी करणाऱ्यांना माजीमंत्री पिचड बळ दिले. या नेत्याचीच वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू झाली आहे, असे लोकांच्या त्यांनी निदर्शनाला आणून दिले व आगामी काळात एकास एक उमेदवार देऊन खरा आदिवासी आमदार जनतेला मिळवून दिला जाईल असे आश्वासन दिले. आणि जो गद्दारी करील त्याला गावबंदी जारी केली जाईल असा त्यांनी इशारा दिला.
डॉ. लहामटे यांनी आदिवासींना “वनवासी’ संबोधणारे आरएसएसचे धोरण आपणाला मान्य नाही आणि एकूणच भाजप नीती आपल्याला मान्य नसल्याने आपण भाजपचा त्याग केला असल्याचे त्यांनी सर्वांच्या समोर पुन्हा एकदा जाहीर केले. ते म्हणाले की जगाला आदर्श देणारी अशी आदिवासी संस्कृती आहे. त्याचे पालन करून यापुढे तालुक्यात “विकासाचा अजेंडा’ राबवला जाईल. शिवाय टिटवाळा पूरग्रस्तांमध्ये अकोले तालुक्याचे दीडशे आदिवासी आहेत.त्यांना मदत करावी असे त्यांनी आवाहन केले.
शिवसेनेचे युवा नेते सतीश भांगरे यांनी जगात एकीकडे परिवर्तनाचा मंत्र गायला जात आहे. परंतु तालुक्यात मात्र अजूनही विकास नसलेले दर्शन इतरांना होत आहे. एकीकडे लॅपटॉपचा जमाना असताना दुसरीकडे आदिवासी महिलेला मात्र घोंगडीची झोळी करून प्रसूतीस नेण्याची दुर्दैवी वेळ येते अशी टीका त्यांनी केलीयावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता भांगरे, माजी उपसभापती यमाजी लहामटे, राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री विनय सावंत, पंचायत समितीचे सदस्य देवराम सामेरे, डॉ. विजय पोपेरे, डॉ. ज्ञानेश्वर झडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव मदन पथवे, युवा नेते अमित भांगरे, शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, चंदू कोकतरे, अशोक माळी आदींची भाषणे झाली.