नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर या कलमांतर्गत येणाऱ्या सर्वच गोष्टी राज्यातून बाद होणार आहेत. याविषयीचे स्पष्ट संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिले होते. कलम रद्द झाल्यानंतर राज्यात वेगळी घटना, वेगळा झेंडा राज्यात नसणार हे शहा यांनी स्पष्ट केले होते. मात्र अद्यापही जम्मू काश्मीरच्या सरकारी कार्यालयांवर राज्याचा वेगळा झेंडा फडकताना दिसत आहे. एवढेच नाही तर इथल्या सचिवालय भवनावर तिरंग्यासोबत लाल झेंडा दिसत आहे.
केंद्रातील सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर दुहेरी नागरिकत्वासोबत राज्यात दुसरा झेंडा यापुढे फडकणार नसल्याचे सांगितले होते. तसेच जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर राज्यात तिरंगा कायम ठेवणे गरजेचे आहे मात्र, सचिवालय भवनाने, आपल्याला सरकारकडून याविषयी अजून कोणतेही आदेश मिळाले नाहीत, ज्यादिवशी याविषयीचे आदेश आम्हाला मिळतील त्यादिवशी आम्ही लाल झेंडे उतरवू आणि देशाचा तिरंगा त्याठिकाणी कायम ठेवू असे म्हटले आहे. तर कलम रद्द झाल्यानंतर सर्वात अगोदर माजी विधानसभा अध्यक्ष निर्मल सिंह यांनी आपल्या सरकारी गाडीवरून लाल झेंडा काढून टाकला होता.