सातारा – महापुराने दाणादाण उडवलेल्या पाटण, कराड शहरासह नदीकाठी असलेल्या सर्वच गावांमध्ये आता पिण्याचे पाणी, अन्नधान्य व पसरणाऱ्या रोगराईचे आव्हान उभे राहिले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने मायक्रो प्लॅनिंग करणे गरजेचे बनले आहे. समाजातील दानशूरांनही त्यासाठी पुढे आले पाहिजे. तसेच मदत करणाऱ्यांनी ती मदत कुठे, कशी करायची याचा आराखडा असणे क्रमप्राप्त बनले आहे. दरम्यान, याशिवाय महामार्गावर गेल्या तीन दिवसांपासून 12 हजार वाहने अडकून पडल्याने त्यांनाही या सुविधा पुरवण्याचे क्रमप्राप्त बनले आहे.
जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाने उघडीप देत मोठा दिलासा दिला आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये हजारो लोक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत. यामुळे याठिकाणी अन्नधान्य मोठ्या प्रमाणात लागत आहेत. याशिवाय पिण्याचे पाणी, अंथरुण, पांघरुण अशा गरजांची आवश्यकता भासते. बहुतेक ठिकाणी पूर बाधित नागरिकांनी सुरुवातीलाच पाहुणे, नातेवाईकांकडे आधार घेतला आहे. पाऊस व पुरामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजना दुरुस्त होण्यासाठी वेळ लागणार आहे. पुरामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य राहणार आहे. यामुळे गावांतील आरोग्याचा प्रश्न उभा राहणार असून साथीच्या रोगाचा फैलाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पाऊस व पुराचा अद्याप धोका असताना हे निर्माण होणारे प्रश्न केवळ शासकीय यंत्रणेपुढे आव्हान नसून त्यासाठी जिल्हावासीयांनी पुढे आले पाहिजे.
घरापासून लांब असलेले ग्रामस्थ घराकडे जाण्यासाठी आतुर आहेत. मोकळी सोडलेली जनावरे जगली आहेत की नाहीत, याचा शोध त्यांना घ्यायचा आहे. यामुळे बुधवारपासून अनेक पुरग्रस्तांनी गावाकडे जाण्यासाठी मोर्चा वळवला आहे. गावामध्ये लोक जाण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याठिकाणी अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी प्रशासनाने पुर बाधीत नागरिकांची मदत करणे अपेक्षित बनल आहे.
समाजातील दानशूरांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी प्रामुख्याने डॉक्टर संघटना, मेडिकल असोसिएशन, भुसार व किराणा दुकान संघटना, व्यापारी संघटना, फळे व पालेभाज्या संघटना, बांधकाम व्यवसायिक यांनी पुरग्रस्त गावांतील लोकांसाठी धान्य, औषधे, साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही यासंबंधी उपायोजना, गावातील स्वछता यासाठी मदतीची भूमिका घेणे आवश्यक आहे. हे सर्व होण्यासाठी नेमकी कुठे, किती व काय मदत पाहिजे, हे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने मदतीबाब मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. सांगणे गरजेचे आहे. त्यानंतरच मदत कार्याला वेग मिळणार आहे.