अरुण गोखले
दु:ख देवाला सांगावे।
सुख देवासी मागावे।।
कोणाकडे काय मागावे हे किती सार्थपणे सांगणारे हे शब्द. नाहीतरी खरंच आहे, उगाच आपण आपलं दु:ख दुसऱ्याला सांगून त्याची कोरडी सहानुभूती मिळवण्यात काय अर्थ आहे! या जगात वाचाळांची मुळीच कमरता नाही. इथे मदतीचा हात पुढे करण्यापेक्षा फुकाचे उपदेशाचे डोस पाजणारेच खूप जण भेटत असतात. कारण इथं खरं कोणालाच दुसऱ्याच्या सुख दु:खाची तेवढी चाड राहिलेली नाही. माणूस हा अधिकाधिक स्वकेंद्रित आणि आपमतलबी झालेला आहे. त्याला दुसऱ्याकडे साधे पाहायलाही वेळ नाही. त्यामुळेच वरील ओळीतील सल्ला हाच लाख मोलाचा वाटतो.
खरोखरच आपण आपलं दु:ख हे जगाला न सांगता ते देवालाच सांगायला हवे. कारण ते दूर करून तोच आपल्याला सुख देऊ शकतो. ते सहन करण्याची ताकद, त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तोच दाखवू शकतो. म्हणून सांगायचं, मागायचं ते त्या एका परमेश्वराकडेच.
देवाकडे मागायचे हे जरी खरे असले तरी त्याच्याकडेही नेमके काय आणि कसे मागायचे? हे आपल्याला साधू संत आणि सत्पुरुष हेच योग्य पद्धतीने शिकवतात. ते म्हणतात की बाबांनो! देवाकडे हेच मागणे मागा की देवा आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. तुझा आठव हा आमच्या मनात सदैव राहू दे.
माणसाचं काय आहे त्याला जराकाही दु:ख झालं, त्याच्यावर काही संकट आलं, तो अडचणीत सापडला की त्याला देव आठवतो. अशा वेळी तो देवाचा धावा करतो. त्याच्या मठमंदिरात जातो. नवस सायास करतो. पण तेच दु:ख, अडचण, संकट, धोका हे दूर झालं की सुखाच्या वेळी त्याला देव आठवत नाही.
इथे द्रष्टे संत हा बोध देतात की बाबारे, जीवनात दु:ख आलं की सर्वचजण त्या देवाची आठवण करतात. त्याचा धावा करतात त्याला पुजतात, भजतात. पण जर आपण त्याच देवाची दु:खाबरोबरच सुखातही आठवण ठेवली. जीवनातलं सुख, समाधान आनंद ही त्याचीच देणं आहे, असे मानले. त्यालाच भजले तर दु:ख ते येणारच कसे? आणि का? यासाठीच देवाला आपण भजत गेलो, त्याला जीवनातल्या प्रत्येक सुख दु:खाचा साक्षीदार ठेवला आणि त्या देवाकडे जर त्याचा विसरच होऊ नये हीच मागणी केली तर ती रास्त होणार नाही का?