पुणे जिल्हा – पुणे आणि सातारा जिल्हा सीमेवरील वीर धरण आठवडाभरापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे भरल्याने शनिवारी धरणाचे सर्व 9 वक्र दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात वाढविण्यात आला आहे. यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने लोणंद-वीर-सासवड रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्त्यावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. नीरा खोऱ्यातील वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.