मुंबई : बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वांच्या पदासाठी अर्ज मागवण्याची मुदत संपली आहे. विश्वचषक स्पर्धेतील अपयशानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. दरम्यान, या पदासाठी तब्बल 2 हजार अर्ज आले आहेत. यातच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, संघाचा प्रशिक्षक होण्याची ही योग्य वेळ नसल्याचेही त्याने यावेळी स्पष्ट केले.
विश्वचषकात भारताच्या कामगिरीवर बोलताना सौरभ गांगुलीने आपले मत व्यक्त केले. भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची माझी इच्छा आहे, परंतु ही योग्य वेळ नाही. अजून काही वेळ जाऊ द्या त्यानंतर मी या पदासाठी अर्ज करेन असे त्याने म्हटले. तसेच सध्या मी इंडियन प्रीमिअर लीग, बंगाल क्रिकेट असोसिएशन, समालोचक अशा विविध पदावर कार्यरत आहे. त्यामुळे या जबाबदारी पार पाडूद्या. त्यानंतर मी प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उतरीन असेही सौरभने यावेळी म्हटले. दरम्यान, भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी टॉम मूडी, रॉबीन सिंग, माईक हेसन आणि लालचंद राजपूत ही नाव अधिक चर्चेची आहेत. नवा प्रशिक्षक मिळेपर्यंत शास्त्रींना 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातून परतल्यानंतरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा करण्यात येणार आहे.