झी5 हा भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारा मनोरंजन ओटीटी प्लॅटफॉर्म भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील फारशा माहीत नसलेल्या कथेवर ‘गोंद्या आला रे’ या मालिकेच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहे. ही १० भागांची मालिका १८९७ सालात तीन अज्ञात नायकांनी, चाफेकर बंधूंनी, दाखवलेल्या शौर्याची व त्यांच्या प्रयत्नांची कथा सांगते. आपल्या अत्याचारांनी पुणे शहर उद्ध्वस्त करणाऱ्या डब्ल्यू. सी. रॅण्ड या जुलमी अधिकाऱ्याची या तीन भावांनी हत्या केली होती.
सुनील बर्वे, भूषण प्रधान, क्षितीज दाते, शिवराज वायचळ, आनंद इंगळे, पल्लवी पाटील, भरत दाभोळकर, अंगद म्हसकरआणि शाल्व किंजवडेकर यांच्या भूमिका असलेल्या या मालिकेचा पहिला भाग १५ ऑगस्ट रोजी फक्त झी5 वर प्रदर्शित होणार आहे.
सोलफ्लिक्स फिल्मवर्क्स, फनी फ्रायडे पिक्चर्सची निर्मिती असलेल्या गोंद्या आला रे मालिकेचे दिग्दर्शन अंकूर काकतकर यांनी केले आहे. चाफेकर बंधू आणि त्यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतात सशस्त्र क्रांतीची सुरुवात कशी केली यावर ही मालिका आधारित आहे. या हत्येमध्ये लोकमान्य टिळकांचा सहभाग होता की नाही या वादग्रस्त मुद्दयावरही मालिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे.
ब्रिटिशांनी या तिन्ही भावांना फाशीची शिक्षा केली पण त्यांनी केलेल्या क्रांतीची गाथा देशभर पसरली. भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या तरुण क्रांतीकारकांना चाफेकर बंधूंपासून प्रेरणा मिळाली.