रायपूर -छत्तिसगढमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये तीन महिला नक्षलींचाही समावेश आहे. राज्य पोलिसांच्या स्पेशल टाक्स फोर्सने आणि डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डने बस्तर जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या विरोधात विशेष संयुक्त मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी एका जंगलात दडलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांना पाहून त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये काही काळ चकमक झडली. त्यामध्ये सात नक्षलवादी मारले गेले.
चकमकीत सामील असलेल्या मृत नक्षलवाद्यांच्या साथीदारांनी पलायन केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी सुरक्षा जवानांनी जंगलाच्या आतील भागात मोहीम हाती घेतली. बस्तरमध्ये सात नक्षलवाद्यांचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठेच यश मानले जात आहे.