पारनेर – निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ हत्या प्रकरणात आर्थिक तडजोडीतून व सूड भावनेतून निर्दोष व्यक्तींना गुंतवणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
या हत्या प्रकरणी कटाचा आरोप असणारे आरोपी बबन कवाद यांनी या हत्याप्रकरणाची सीबीआयकडून चौकशी व्हावी व या प्रकरणात दाखवलेले खोटे साक्षीदार व इतर बनावट कागदपत्रे तयार करून काहींना विनाकारण राजकीय दबावातून सूड भावनेने गुंतवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, तसेच यातील दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेताना वरील आदेश दिले.
यापूर्वी न्यायालयाने या प्रकरणाचा नगर पोलीस अधीक्षकांकडून चौकशी अहवाल मागविला होता. तो बंद अहवाल गेल्या सुनावणी वेळी उघडला होता. त्यात पोलीसांकडून तपासात चुका झाल्याचे म्हटले होते. तसेच तपासी अधिकारी आनंद भोईटे यांची या प्रकरणी विभागीय चौकशी आदेशीत केल्याचे, तर दुसरे दोषी आढळलेले त्यांचे मदतनीस पो. कॉ. रवींद्र पांडे यांची एक वर्षाकरता पगारवाढ थांबवली असल्याचे म्हणणे न्यायालयात सादर केले होते.
जाणीवपूर्वक चुका केल्याचे मत न्यायालयाने व्यत केले. त्यानंतर या प्रकारचे खोटे जबाब नोंदवणे, खोटे दस्तऐवज तयार करून आरोपीविरुद्ध आरोपपत्रात दाखल करणे ही बाब कलम 462 अंर्तगत कशी येते व त्यानंतर त्या पोलिसांनी कागदपत्रांमधील फेरफार करण्यासाठीचा केलेला प्रयत्न व त्यासंबंधी केलेला बनावटपणा सीआरपीसी सेक्शन 161 अंर्तगत सीआरपीसी 154 प्रमाणे कोणते गुन्हे कसे नोंदवता येतील हे न्यायालयाला पटवून द्या, असे आदेश याचिकाकर्त्यांला गेल्या सुनावनी वेळी केले होते. सुनावणी वेळी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे व त्यांचे मदतनीस लेखनीक पो. कॉ. रवींद्र पांडे यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.