नवी दिल्ली : जमिनीवर आणलेली (ग्राउंडेड) सर्व 17 विमाने ऑक्टोबर अखेरपर्यंत पुन्हा सेवेत घेण्याची तयारी एअर इंडियाने सुरू केली आहे. एअर इंडियाचे प्रमुख अश्वनी लोहानी यांनी ही माहिती दिली. दुरुस्ती आणि देखभालीसाठी निधी नसल्यामुळे ही विमाने सेवेतून काढून टाकण्यात आली होती. ही विमाने चार महिन्यांपासून एक वर्षाच्या काळापर्यंत सेवेबाहेर आहेत.
एअर इंडियाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, सेवाबाह्य असलेल्या सर्व 17 विमानांना ऑक्टोबरपर्यंत सेवेत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आठ विमाने तर ऑगस्टपर्यंतच सेवेत येतील. या आठ विमानांपैकी चार विमाने ए20 जातीची आहेत. एक विमान बी747 जातीचे, एक बी777 आणि दोन बी787 जातीची आहेत. उरलेली सर्व नऊ विमाने ए320 जातीची असून देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्यास त्यांनाही ऑक्टोबरपर्यंत सेवेत घेण्याचा प्रयत्न आहे. आम्ही महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यासाठीच सेवेबाहेर असलेल्या विमानांना पुन्हा सेवेत आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. ही विमाने नव्या मार्गांवर चालविली जातील. ही विमाने लवकरात लवकर उड्डाण भरतील, असा आम्हाला विश्वास असल्याचे लोहानी यांनी यावेळी सांगितले.