नवी दिल्ली – रेल्वेने आपल्या देशभरातील मालमत्तांच्या रक्षणासाठी लष्करातील निवृत्त जवानांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी रेल्वेने आपल्या विभागीय व्यवस्थापकांना रेल्वे मालमत्तांच्या रक्षणासाठी होमगार्ड, महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा दल अशा सरकारी सुरक्षा संस्थांची मदत घेण्याचे अधिकार दिले होते.
आता त्या आदेशात बदल करण्यात आले असून या कामासाठी सैनिक कल्याण बोर्डामार्फत माजी सैनिकांची नियुक्ती करण्याचे अधिकार विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गरजेनुसार माजी सैनिकांच्या सेवांचा उपयोग करून घेतला जाणार आहे. रेल्वेच्या सुरक्षा विभागात सध्या 76 हजार 563 सुरक्षा कर्मचारी कार्यरत आहेत. तथापी हे संख्याबळ मंजुर संख्याबळापेक्षा पंधरा टक्क्यांनी कमी आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.