आदित्य ठाकरे ः “जन आशीर्वाद’ ही माझ्यासाठी तिर्थ यात्रा
जळगाव – राज्यातील शेतकरी सध्या अडचणीत आहे. पावसाने अद्यापही ओढ दिल्याने अनेक भागात दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. याशिवाय राज्यात सर्वत्र जातीपातीचे राजकारण सुरु आहे. हे चित्र बदलण्यासाठी ही यात्रा काढली आहे. मतं मागण्यासाठी आलेलो नाही. माझ्यासाठी ही तीर्थ यात्रा आहे. महाराष्ट्र जिंकण्याची हीच वेळ आहे, असे आवाहन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातून आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज सुरुवात झाली. जळगावात आयोजित सभेत ते बोलत होते. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जन आशीर्वाद यात्रा राज्य सरकारमध्ये कोणतेही पद मिळवण्यासाठी आयोजित केलेली नसून मला महाराष्ट्र घडवायचा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आदित्य ठाकरे म्हणाले, “मी कोणतेही पद मिळवण्यासाठी ही यात्रा आयोजित केलेली नाही. मला काहीतरी बनायचं आहे म्हणून ही यात्रा काढलेली नाही. मला महाराष्ट्र घडवायचा आहे. कोणतीही तारीख, कोणताही मुहूर्त न पाहता मी आजपासून बालेकिल्ल्यातून सुरुवात करतोय. कारण मला प्रत्येक नागरिकाचे आभार मानायचे आहेत.
लोकसभा निडणुकीत ज्यांनी शिवसेनेला मतदान केले, मला त्यांचे आभार मानायचे असून त्यांची मनं जिंकायची आहेत. आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे, त्यासाठी प्रत्येकाला सोबत घेऊन काम करावे लागणार आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, येत्या काळात आदित्य ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून आदित्य ठाकरे हे राजकीयदृष्ट्या सक्रीय झाले आहेत.