नगर – आषाढ महिन्यातील शुक्ल बुढवार दि.17 जुलै च्या पहाटे संपूर्ण भारतातून खंडग्रास चंद्रग्रहणाचा आविष्कार दिसला, अनेक खगोल प्रेमींनी या खगोलीय आविष्काराचा अनुभव आपल्या डोळ्यांत आणि मोबाईल मध्ये साठविण्याचा प्रयत्न केला, अशा खगोलप्रेमींनी कालची रात्र अक्षरशः इमारतींच्या टेरेसवर जागून काढली. अनेकांनी ग्रहण काळात जाणवणाऱ्या बदलांची टिपणही काढली. ऐन पावसाळ्यातही रात्री आकाश निरभ्र असल्याने ढगांचाही कोणताही व्यत्यय ग्रहण काळात आला नाही.
या खंडग्रास चंद्रग्रहणाचे वेध दि. 16 जुलैला सुरू झाले. दि.17 जुलैच्या पहाटे 1.30मिनिटांनी वाजता प्रत्यक्ष ग्रहण स्पर्श झाला. रात्री 3.01 वाजता ग्रहण मध्य आणि पहाटे 4.30 वाजता ग्रहणाचा मोक्ष झाला. त्यामुळे ग्रहणाचा पर्वकाळ तीन तासांच्या अवधीचा होता. या दरम्यान पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. ग्रहणाविषयी कुठलीही भिती न बाळगता हा खगोलिय आविष्कार आहे, हे ध्यानात ठेवून सर्वांनी या ग्रहणाचा आविष्कार अनुभवला.सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येत असल्याने पृथ्वीची सावली चंद्रावर पडली. त्यामुळे चंद्रबिंब काळवंडले. हे खंडग्रास चंद्रग्रहण असल्याने चंद्रबिंब पूर्णपणे काळे झाले नाही.