मुंबई: काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी मराठा साम्राज्यावर भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील हा व्हिडीओ आपल्या फेसबुकवर पोस्ट केला आहे. एका कार्यक्रमात थरूर यांना भारतावर इंग्रजांचं राज्य नसतं तर आता भारताची स्थिती काय असती, असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर थरूर म्हणाले, मराठ्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात साम्राज्यविस्तार केला होता. अगदी तंजावरपर्यंत मराठ्यांचं राज्य होते. त्यामुळे जर भारतावर इंग्रजांचं राज्य नसतं तर मराठ्यांचं साम्राज्य निर्माण झालं असतं, असे थरूर म्हणाले.
भारतात मराठा साम्राज्य असतं तर देशात धार्मिक सहिष्णुतेचं वातावरण तयार झालं असतं. कारण ग्रेट मराठा किंग शिवाजी महाराज यांचा असा विचार होता की, युद्धादरम्यान एखादं कुराण सापडलं तर ते एखाद्या मुस्लीम व्यक्तीच्या हाती देईपर्यंत ते कुराण व्यवस्थित ठेवलं पाहिजे, असेही थरूर म्हणाले