पिंपरी – म्हाडाने मोरवाडी येथील गृह प्रकल्पातील मोकळी जागा 15 वर्षांपासून विकसित केली नाही. तसेच महापालिककडे हस्तांतरित देखील केली नाही. असे असताना बांधकाम परवानगी विभागाने पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. म्हाडामुळे स्थानिक नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागले असल्याने आयुक्तांनी म्हाडाचा पिंपरीगावातील प्रकल्प बंद करावा, अशी मागणी संत ज्ञानेश्वर सहकारी गृहरचना फेडरेशनचे अध्यक्ष व स्वीकृत सदस्य बाबू नायर यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात हटले आहे की, मोरवाडी येथे म्हाडाने 16 एकर जागेमध्ये 20 वर्षापूर्वी सुमारे दोन हजार सदनिका बांधल्या आहेत. त्यापैकी दीड एकर मोकळी जागा नियमांप्रमाणे म्हाडाने विकसित करुन महापालिकेच्या ताब्यात देणे आवश्यक आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेच्या चुकीच्या कारभाराचा फटका रहिवाशांना बसला आहे. बांधकाम परवानगी, भुमी जिंदगी आणि नगररचना विभाग यांच्यात समन्वय नाही. मोकळी जागा महापालिकेला दिली नसताना बांधकाम परवानगी विभागाने म्हाडाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. म्हाडाकडे मोकळी जागा देण्याबाबत दीड वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. परंतु, म्हाडाचे अधिकारी प्रतिसाद देत नाहीत, असेही या निवेदनात म्हटले आहे.