सातारा – किकली ता. वाई येथे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी करण्यात आली. तसेच “1 जुलै ते 7 जुलै’ हा कृषी सप्ताह म्हणून देखील कृषिदूतांनी साजरा केला. या सप्ताहातील विविध कार्यक्रमांना शेतकरी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सप्ताहामध्ये स्व. वसंतरावजी नाईक जयंती, कृषीदिंडी, वृक्षारोपण, दुधाळ जनावरांचे लसीकरण, सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन, सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
स्व. वसंतराव नाईक यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. त्यानंतर कृषिदूत व ग्रामपंचायत, किकली तसेच जि. प. शाळा, किकली यांच्या संयुक्त विद्यमाने गावात भव्य वृक्षदिंडी काढली व परिसरात वृक्षारोपण केले. यामध्ये प्रामुख्याने आंबा, जांभूळ, सीताफळ, पेरू, चिंच आदी झाडांचे रोपण करण्यात आले. तसेच फलकाद्वारे संदेश देऊन पर्यावरण संबंधी जनजागृती करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच धनंजय बाबर, उपसरपंच संदीप बाबर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक बी. एल. शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुमार बाबर, मुख्याध्यापिका शमा शेख, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कृषी सप्ताहामध्ये दुधाळ जनावरांचे लसीकरण पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन करण्यासाठी संतोष बरडकर (सेंद्रिय शेती तज्ज्ञ) यांना आमंत्रित केले होते. त्यांनी शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. तसेच सोयाबीनचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कृषिदूतांनी कृषी साहाय्यक श्री. विलास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करून दाखवले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, कराडचे कृषिदूत भोसले मयूरराज, बोबडे संकेत, चव्हाण प्रसाद, चव्हाण सोहम, आवटे श्रीधर, घालमे शशिकांत यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत या सप्ताहाचे नियोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय, कराडचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. धनंजय नावडकर, केंद्राध्यक्ष डॉ. मोहन शिर्के, सहयोगी अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. समीर ढगे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले.