चासकमान – चासकमान परिसरात चांगलाच पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. या संततधार पावसामुळे चासकमान धरणाची पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली आहेत.
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजाची कृपा बळीराजावर झाली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने पेरणी खोळंबली आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांची 10 टक्के पेरणी झाली मात्र, पाऊस उसंत घेत नसल्याने पेरण्या अर्धवटच रखडल्या आहेत. त्यामुळे बळीराजा आता पाऊस थांबण्याची वाट पाहत असल्याने आणखी काही दिवस पेरण्या शक्य नसल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे.
जूनच्या शेवटी झालेल्या पावसामुळे ओढे-नाले तुडूंब भरून पाणी वाहून लागले आहेत. तसेच काही ठिकाणी थोड्या मोठ्या प्रमाणात नुकसान ही झाले आहे. जमिनी मधील पाणीसाठ्यात तसेच विहिरीदेखील पाण्याची पातळी वाढ झाली आहे. जून महिन्याच्या शेवटी चांगलाच पाऊस पडला असल्याने विहिरींचीदेखील पाणीपातळी वाढली आहे. पावसामुळे या भागात हिरवळ पसरू लागली असल्याने आगामी काहि दिवसांत येथील निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
भात रोपांना जीवदान
खेडचा पश्चिम भाग भाताचे आगार म्हणून ओळखला जातो. या भागात सुमारे 3300 हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. दरम्यान, या परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने भातरोपांना जीवदान मिळाले असून रोपे तरारली आहेत. समाधनकारक पाऊस व तरारलेली रोपे यामुळे भातलागवडी वेळेवर सुरू होणार असल्याची शक्यता बळीराजाने व्यक्ती केली आहे. भातखाचरे अद्याप काही ठिकाणी तुडुंब भरलेली नाहीत. ज्या ठिकाणी भातखाचरे तुडूंब भरलेली आहेत, त्याठिकाणी भातरोपेच तयार नसल्याने लागवडी खोळंबल्या आहेत.