नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानस्थित बालाकोटमधील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. परंतु, हवाई दलाने अशाप्रकारचे एअर स्ट्राईक याआधीही केले असल्याचा खुलासा केला आहे. हवाई दलाचे सेंट्रल कमांड एयर ऑफिसर कमांडिंग इन चीफ राजेश कुमार यांनी ही माहिती दिली. भारतीय हवाई दलाने कारगिल युद्धाच्या २० वर्षपूर्तीनिमित्त एक सेमिनार आयोजित केले होते. यावेळी राजेश कुमार यांनीही पत्रकार परिषदेला संबोधित केले.
राजेश कुमार यांनी म्हंटले कि, २ ऑगस्ट २००२ साली नियंत्रण रेषा पार करत पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील केल सेक्टरस्थित दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आले होते. या एअर स्ट्राईकमध्ये मिरज या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला होता. शिवाय लेझर गाईडेड बॉम्बही वापरण्यात आले होते. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर २००२ साली ऑपरेशन पराक्रम या नावाने ही एअर स्ट्राईक करण्यात आली होती. दरम्यान, याआधी २००२ सालच्या एअर स्ट्राईकबद्दल माहिती दिली गेली नव्हती.