राजगुरूनगर – राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून राजगुरुनगर येथील युवकाने केदारेश्वर बंधाऱ्यात पाठीवरच्या सॅकमध्ये दगड ठेवून पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज (दि. 19) उघड झाली आहे.
रुपेश विष्णू बोऱ्हाडे (वय 28, रा. राजगुरुनगर, तिन्हेवाडी रोड, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे याबाबत खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजगुरुनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्यात आज (दि. 19) मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर नगरपरिषद कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने पाण्यातील मृतदेह बाहेर काढण्यात आला.
रूपेशने आत्महत्या करतेसमयी त्याच्या जवळील सॅकमध्ये 10 किलोपेक्षा जास्त वजनाचा दगड ठेवून पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. मृतदेह रुपेश विष्णू बोऱ्हाडे यांचा असल्याचे त्याच्याजवळ असलेल्या पासपोर्ट वरून ओळख पटली. रुपेश हा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा तीन वर्षांपासून अभ्यास करत होता; मात्र या परीक्षेत अपयश येत असल्याने रुपेश नाराज होता. या अपयशाने खचून जाऊन रुपेशने केदारेश्वर बंधाऱ्यात आत्महत्या केली. असा जबाब रुपेशचे वडील विष्णु बोऱ्हाडे यांनी खेड पोलिसांत लिहून दिला आहे. अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.