नीरा नरसिंहपूर – इंदापूर तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढत चालली असून टॅंकरच्या खेपा वाढवण्याची मागणी होत आहे. पावसाळा लांबल्याने पाणी टंचाईच्या गावांची संख्या वाढण्याची शक्यता वाढली आहे. नीरा नदी पट्ट्यातील गावातच टंचाई परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे.
मागील वर्षीच्या मोसमात पावसाने हजेरी लावली नसल्याने पाण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. दुष्काळाची दाहकता वाढतच चालली असून जनावरांचा चारा व पाण्याची उपलब्धतेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. नीरा नदी पट्ट्यातील ओझरे, गोंदी, लुमेवाडी, लिंबोडी, सराटी, निरनिमगाव, भगतवाडी, लाखेवाडी आदि गावांना टॅंकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नीरा नदी पट्ट्यातील गावांना भीमा नदी पट्ट्यातील गावातील विहीरी, विंधन विहीरीवर टॅंकर भरून पाणी पुरवठा केला जात आहे. नीरा व भीमा नद्यांच्यामधील पाच किलोमीटर अंतरावर एकीकडे पाण्याचा सुकाळ तर दुसरीकडे दुष्काळाचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नीरा नदी मागील बारा महिन्यापासून कोरडी पडल्याने त्याच्या काठावरील गावात पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.
टॅंकर भरण्यासाठी पिंपरी बुद्रुक, टणू व गणेशवाडी येथील विजेच्या वेळेचा फटका अनेकदा बसला आहे. त्यामुळे खास टॅंकरच्या पाणी भरण्यासाठी स्वतंत्र विजेची सोय करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तर पाणी पुरवठा करताना अनियमीतता होत असून अनेक ठिकाणी वशीलेबाजी करून पाणी वाटप करण्यात येत आहे. यावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
भीमा नदीच्या पाण्याचे नियोजन आवश्यक
नीरा नदीच्या सध्याच्या परिस्थितीला नागरिकांबरोबर पदाधिकारी, अधिकारी व राजकारणी लोकच जबाबदार असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. अशाच पद्धतीने भीमा नदीच्या पाण्याचा प्रश्नही काही काळाने गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअगोदरच संभाव्य धोका ओळखून भीमा नदीच्या पाण्याचे नियोजन करणे आता आवश्यक बनले आहे.