काही महिन्यांपूर्वी कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण झाल्याचे अनेक आरोप “मी टू’ चळवळीच्या निमित्ताने करण्यात आले. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही नावे घेतली गेली होती. मनोरंजन क्षेत्रात खळबळ निर्माण करणारी ही चळवळ जशी अचानक वाढली, तशीच ती अचानक थंडही झाली.
ही चळवळ थंड होता कामा नये, तर सुरूच राहिली पाहिजे, असे मत तापसी पन्नूने व्यक्त केले आहे. विकास बहलला क्लीन चीट मिळणे आणि आलोकनाथ यांना “दे दे प्यार दे’मध्ये स्थान दिले जाण्याच्या संदर्भात ती बोलत होती. जर एखाद्या व्यक्तीविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप असतील पण त्याला शिक्षा झालेली नसेल, तर या चळवळीचा मुख्य उद्देश सफल होत नाही आहे.
याशिवाय ज्या महिलेने आपल्याबाबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी धैर्य एकवटले होते, तिचेही खच्चीकरणच होते. मात्र अशा मुलींनी आपल्यावरील अन्यायाला वाच फोडण्यापासून थांबायला नको, असे तापसी म्हणाली. अडचणी येतच राहतील, पण हार मानत कामा नये. कारण सहन करणाऱ्या मुली अनेक वर्षे गप्प बसतात आणि कित्येक वर्षांनी त्यांच्यातील असंतोष उफाळून येतो.