कानपुर- सरकारकडून काही चुकीचे घडले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारला विधायक सल्ला देईल असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. लोकांकडून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारकडून सत्तेचा गैरवापर होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे असा इशाराही त्यांनी दिला आहे.
संघाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की लोकांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींकडे अमर्याद सत्ता असते. त्याचा अर्थ या सत्तेचा गैरवापर केला पाहिजे असे नव्हे. सरकारकडून काही चुका झाल्याचे लक्षात आले तर संघ योग्य वेळी सरकारला विधायक सल्ला देण्याची भूमिका बजावेल.
दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी संघाच्या स्वयंसेवकांना आणि कार्यकर्त्यांना उद्धटपणे न वागण्याचा सल्ला दिला आहे. स्वयंसेवकांनी कितीही चांगले काम केले असले किंवा त्यांनी अनेकांना कितीही मदत केली असली तरी त्यांनी लोकांशी ऍरोगंटपणे वागणे योग्य नाही. समाजातील व्यसने, असमानता आणि निरक्षरता दूर करण्याच्या कामी स्वयंसेवकांनी योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.