– दत्तात्रय गायकवाड
वाघोली – शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांनी विजयश्री खेचून आणल्यानंतर हवेली तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा कात टाकली असल्याचे सिद्ध केले आहे. शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे चौकार मारण्याच्या तयारीत असताना त्यांचा चौकार कोल्हे यांनी रोखला. राष्ट्रवादीच्या विजयामुळे राष्ट्रवादीमध्ये एकसंधपणा दिसून आला. राष्ट्रवादीच्या विजयानंतर हवेली तालुक्यातील राष्ट्रवादीला ऊर्जितावस्था आली आहे. हवेली तालुक्यातील 38 गावे कोल्हे यांच्यासाठी निर्णायक ठरली आहेत. या गावांतूून कोल्हे यांना 8 हजार 210 मतांची आघाडी मिळाली.
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हवेली तालुक्याचे विभाजन झाले. त्यानंतर हवेली तालुक्यातील 38 गावे शिरूर विधानसभेला जोडण्यात आली. व शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. तसेच काही गावे पुरंदर खडकवासला, हडपसर विधानसभेला जोडण्यात आली आहेत. इतर तालुक्यात काही गावे समाविष्ट आहेत. मात्र, शिरूर विधानसभेचा निर्णायक कौल देण्याची क्षमता हवेली तालुक्यावर अवलंबून आहे. विधानसभेचे आडाखे हे हवेली तालुक्यावर बांधले जातात. आढळराव पाटील यांनी हवेली तालुक्यात शिवसेनेची मजबूत फळी निर्माण केली आहे. त्या माध्यमातून आढळरावांना हवेली तालुक्याने तीन वेळा साथ दिली आहे. तालुक्यातील विकासकामे, नागरिकांशी थेट संवाद या बळावर आढळरावांनी हवेलीत मतांची पेटी भक्कम केली होती. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐन मोक्याच्यावेळी अमोल कोल्हे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मतदारसंघात वातावरण बदलून गेले. त्याला हवेली तालुका अपवाद राहिला आहे. शिरूर मतदारसंघात शिवसेनेची विचारधारा आणि आढळराव यांच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापासून मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सलग तीनवेळा विजयी झालेल्या आढळरावांना चौकार लगावण्यासाठी मताधिक्यांची ताकद हवेली तालुक्यातून मिळू शकली नाही. मागील निवडणुकीत आढळराव पाटील यांना 27 हजार 500 मतांची आघाडी मिळाली होती. ती यावेळी मोडीत काढली.
दरम्यान, कदमवाकवस्ती गावातून कोल्हे यांना 3 हजार 243 मते मिळाली आहेत तर आढळराव पाटील यांना 4 हजार 272 मते मिळाली. या गावाने आढळराव पाटील यांना 1029 मतांची आघाडी देऊन तारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला.
यशवंतची नाराजी भोवली
हवेली तालुक्यातील बहुचर्चित यशवंत सहकारी साखर कारखाना हा निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतो. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यशवंतवरून कलगीतुरा रंगलेला असतो. या कारखान्यावरून दोन्ही उमेदवारांकडून आश्वासनाची खैरात केली जात आहे. गेल्या पंधरा वर्षांत या कारखान्यास उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. वाहतूक कोंडी, स्थानिक रोजगाराचा प्रश्न, कामगारांच्या व्यथा, हवेली तालुक्यातून नाशिक रेल्वे मार्गाचे जाळे जात आहेत. यातून निर्माण होणारी नाराजी आढळरावांना भोवली. शिवसेनेमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा फटका आढळरावांना बसला आहे. हा गाफीलपणा त्यांना नडला आहे. पंधरा वर्षांपासून संघटनांची बांधलेली मोट एका निवडणुकीत विस्कळीत करण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. त्याचा दूरगामी परिणाम हवेलीच्या राजकीय पटलावर होणार आहे. विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूरच्या आखाड्यात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहे.
प्रदीप कंद यांच्याकडून तगडी मोर्चेबांधणी
राष्ट्रवादीकडून डॉ. कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हवेली तालुक्याची धुरा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी खांद्यावर घेतली. त्यानंतर हवेली तालुक्यातील एकोपा, संघटन गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच दिसून आले. विधानसभेचे पुढे बघू, पण आधी लगीन कोंढण्याचं, या जोशात कंद आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फळी मैदानात उतरली. त्यात कोल्हे यांची प्रतिमा आणि राष्ट्रवादीचा नियोजनबद्ध प्रचार ही जमेच्या बाजू आहेत. शिरूर- हवेलीतील राष्ट्रवादीतील अंतर्गत दुफळी यावेळी बाजूला ठेवत कोल्हे यांच्या मताधिक्यांसाठी झटत राहिली. त्याची प्रचिती निकालानंतर दिसून आली. शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यासह अनेक राष्ट्रवादीच्या गावोगावच्या पदाधिकाऱ्यांनी आपले गट- तट बाजूला ठेवून राष्ट्रवादीची एकी दाखवत सामूहिक प्रयत्न केले. त्यामुळे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला 26 हजार 200 मताधिक्य मिळवून देण्यात यश मिळवून दिले.
तीन जिल्हा परिषद गटांत कोल्हेंना तारले
पेरणे- वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटातून कोल्हे यांना 15 हजार 460 मते तर आढळराव पाटील यांना 7 हजार 978 मते मिळाली आहेत. कोल्हे यांनी या गटातून 7 हजार 482 मतांची आघाडी घेतली. उरुळीकांचन- सोरतापवाडी गटातून 11 हजार 810 मते कोल्हे यांना तर आढळराव यांना 9 हजार 475 मते मिळाली. या गटातून कोल्हेंनी 2 हजारांची आघाडी घेतली. थेऊर- लोणी काळभोर गटातून 14 हजार मते कोल्हे यांना तर आढळराव यांना 8 हजार 958 मते मिळाली. या गटातून कोल्हेंनी 5 हजार मतांची आघाडी घेतली. वाघोली- आव्हाळवाडी गटात आढळराव यांना 16 हजार 027 मते तर डॉ. कोल्हे यांना 9 हजार 882 मते मिळाली आहेत. या गटातून 6 हजारांची आघाडी आढळराव यांना मिळाली आहे.