भरधाव कारचा टायर फुटल्याने घडली दुर्घटना
सर्व मृत औरंगाबाद येथील रहिवाशी
बेळगाव – बेळगाव येथील महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात श्रीनगर गार्डनजवळ घडला असून यात पाचजणांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर केएलई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व मृत औरंगाबाद येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादहून जीपने सहा जण बंगळुरूला निघाले होते. बंगळुरू-पुणे महामार्गावर बेळगाव शहरातील श्रीनगर गार्डनजवळ दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास भरधाव निघालेल्या जीपचे अचानक टायर फुटले आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. जीप दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला रस्त्यावर गेली.त्याचवेळी कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसली. धडक जबरदस्त असल्याने जीपमधील पाच जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मृतांची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.