आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याच्या घटनेला लोटली सात वर्षे
नगर: शहराचं भूषण असलेला कौन्सिलहॉल 1 मे 2013 रोजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्या घटनेला 1 मे रोजी सात वर्ष पूर्ण झाली. सारं शहर हळहळलं कारण घटनांच तशी मनाला चटका लावणारी होती.नगर शहराला भेट देणाऱ्या प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तींचे पाय या वास्तूला लागायचे,यावास्तूत झालेल्या साध्यासाध्या कार्यक्रमांनाही राजसपण लाभावं इतकी परिसस्पर्शी ही वास्तू होती.मात्र शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत ही वास्तू अगदी अग्नीशमनदल हाकेच्या अंतरावर असतांनाही असंख्य नागरीकांच्या डोळ्यादेखत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.नंतरच्या काळात यावास्तूचे नूतनीकरण करणार असल्याचं जाहिर केलं मात्र या घोषणेचा मनपाला विसर पडलेला दिसतो.
नगरच्या पहिल्या महिला महापौर शीला शिंदे यांच्या कारकिर्दीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात ही घटना घडली त्यानंतर सत्तेत आलेल्या आ.संग्राम जगताप महापौर असतांना त्यांनी या वास्तूचे नूतनीकरण करणार असल्याचे सांगितले, मात्र त्यांच्या कारकिर्दीत ते होवू शकले नाही. कळमकरांना कारकिर्दीचा कालावधीच कमी मिळाला. मात्र त्यानंतर सुरेखा कदम महापौर झाल्या त्यांनीही या वास्तूच्या नूतनीकरणासाठी पुढाकार घेतला त्यांच्या कारकिर्दीत या वास्तूचे फायर ऑडिट करण्यात आले.
ही वास्तू पुनर्वापरासाठी योग्य असल्याचा निर्वाळाही ऑडीट करण्यासाठी आलेल्या समितीने दिला. त्याचबरोबर विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी त्यांच्या निधीतून 10 लाख रुपये या नूतनीकरणासाठी देत असल्याचे पत्र तत्कालीन आयुक्तांना दिले मात्र त्या पुढे या बाबी सरकल्या नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडीत जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लबभाई पटेल ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर ,स्वामी विवेकानंद ,जमशेटजी टाटा, बाबु जगजीवनराम,निलमसंजीव रेड्डी, इंदिरा गांधी,या अश्याच अन्य महनीय व्यक्तींच्या तैलचित्रांनी या सभागृहाची शोभा वाढविली जोती ती सारी तैलचित्र या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने ,आणि जुनं लाकडी बांधकाम जळून गेल्याने या वास्तूची अपरिमित हानी झाली.
मध्यंतरीच्या काळात या वास्तूच्या नुतनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली, यावास्तूतील महनीय व्यक्तींची तैलचित्रे पुन्हा लावणार पुन्हा पुर्वीचे वैभव या वास्तूला प्राप्त करून देणार असल्याचे पदाधिकाऱ्याकडून ऐकायला मिळाले मात्र एरवी प्रमाणेच याही गोष्टी हवेतच विरल्या.नुकतीच या घटनेला 1 मे रोजी सहावर्षे पुर्ण झाली.मात्र या वास्तूच्या नशीबी फक्त प्रतिक्षाच आली आहे.
रस्ते गटारीच्या कामातून वेळ मिळेल तेव्हा…
मनपाचे अभियंता आणि पॅनेलवर असलेल्या स्थापत्यशास्त्रज्ञांनी या हॉलच्या संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही.रस्ते आणि गटारीच्या कामातून वेळ मिळेल तेव्हा ते या सभागृहाच्या कामात लक्ष घालतील माझे विरोधी पक्ष नेते पदाचा कार्यकाळ संपला तरीही या अधिकाऱ्यांना अजूनही वेळ मिळत नाही असी खोचक प्रतिक्रियानगर सेवक बाळासाहेब बोराटे यांनी दैनिक प्रभातशी बोलतांना दिली.