विष्णू सानप
-3 महिन्यात
-100 लोकल तर
-22 एक्सप्रेस रद्द
पिंपरी – पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असल्याने लोकलची संख्या किंवा एक्सप्रेस गाड्यांची संख्या थोडीही कमी-जास्त झाल्यास लगेचच प्रवाशांवर त्याचा परिणाम होतो. मात्र, मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या संयमाची परिक्षा दिवसेंदिवस घेतली जात असून ब्लॉकच्या नावाखाली लोकल व एक्सप्रेसच्या फेऱ्या रद्द होण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जानेवारी ते मार्च 2019 या तीन महिन्यांच्या कालावधीत शंभर लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या तर 22 एक्सप्रेस रद्द झाल्या आहे. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या जनजीवनावर झाला असून यामुळे रेल्वे प्रवाशी रेल्वे प्रशासनावर कमालीचे नाराज आहेत.
पुणे-लोणावळा व तळेगाव दरम्यान प्रवाशांना प्रवास करण्यासाठी 44 लोकल गाड्या आहेत तर, मुंबईला जाण्यासाठी मोजक्याच एक्सप्रेस गाड्या आहेत. मात्र, त्यापैकी गेल्या काही महिन्यांपासून 42 लोकल गाड्याच सुरु असून दोन गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. शिवाय रद्द होणाऱ्या लोकल व एक्सप्रेसची संख्या मोठी असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून आजघडीला 22 लाखांच्या आसपास आहे. त्या तुलनेत लोकलच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असून फेऱ्या वाढवून दोन गाड्यातील वेळ कमी करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून प्रवासी करीत आहेत. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासन सर्रास दुर्लक्ष करत आहे.
गेल्या महिन्यात पुण्याकडे जाणारी लोकल चिंचवड रेल्वे स्थानकावर अचानक रद्द करुन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची थट्टाच केली होती. सध्या सातत्याने रेल्वेकडून सुरू असलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात करोडो रुपये खर्च करुन मेट्रो प्रकल्प उभारला जात आहे. मात्र, आहे त्या रेल्वेच्या दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधीकडून उदासिनता दाखवली जात आहे. सातत्याने कमी होत असलेल्या लोकलच्या फेऱ्या, पुणे मुंबई दरम्यानच्या एक्सप्रेस गाड्या यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत असून ब्लॉकच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी मागणी होत आहे.
रेल्वे रुळ, ऍटोमॅटीक सिग्नल, ओव्हर हेड वायर यांच्या दुरुस्तीसाठी व भुयारी मार्गाच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉक घेतले जातात. रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळावा हाच रेल्वे प्रशासनाचा हेतू आहे. ब्लॉकच्या यंत्रणेमध्ये येत्या काळात सुधारणा करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.
संजय कुमार, प्रभारी जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे