ऍक्टर इमरान खानच्या संसाराबाबत अलीकडेच एक वाईट बातमी समजली आहे. इमरानची पत्नी अवंतिका घर सोडून निघून गेली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपल्या नावातून “खान’ हे आडनावही हटवले आहे. आता तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे नाव अवंतिका मलिक असे दिसते आहे.
इमरान आणि अवंतिकाचे लग्न 8 वर्षांपूर्वी झाले होते. त्यापूर्वी जवळपास 8 वर्षे ते डेटिंग करत होते. मात्र अलीकडे त्यांच्यात खटके उडायला लागले होते. पाली हिल्समधील इमरानचे घर सोडून अवंतिका निघून गेली आहे आणि आपल्याबरोबर इमारा या छोट्या मुलीलाही ती घेऊन गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती माहेरीच राहते आहे. आता ही लक्षणे लवकरच यांचा घटस्फोट होणार याचीच आहेत, हे उघड आहे. तिच्या आईने मात्र हे दोघेही कायदेशीररित्या विभक्त होण्याची शक्यता फेटाळली आहे. पती-पत्नीमध्ये काही मतभेद आहेत, पण हे मतभेद दूर केले जाऊ शकतील, असे त्या म्हणाल्या.
सध्या या दोघांमधील मतभेद मिटवण्यासाठी त्यांचे मित्र, नातेवाईक आणि काही कॉमन फ्रेन्ड प्रयत्न करत आहेत. हे मतभेद नक्की कोणत्या कारणामुळे निर्माण झाले आहेत, याचा तपशील मात्र अद्याप समजलेला नाही.
कामाच्या बाबतीत बोलायचे तर “दिल्ली बेल्ली’ आणि “जाने तू या जाने ना’ सारख्या सिनेमांच्या हिरोला आता डायरेक्टर व्हावेसे वाटते आहे. तो “मिशन मार्स : किप वॉकिंग इंडिया’ या शॉर्टफिल्मचे डायरेक्शन करणार आहे. त्याने जरी डायरेक्शनकडे वळायचे असे ठरवले असले, तरी काही महिन्यांपूर्वी तो ऍक्टिंगमध्ये पुन्हा सक्रिय होण्याचाच विचार करत होता. कंगणा रणावतबरोबरचा “कट्टी बट्टी’ हा त्याचा अखेरचा सिनेमा होता. हा सिनेमा आपटला आणि त्याच्या बरोबर इम्रानचे ऍक्टिंगचे करिअरही आपटले होते. त्यामुळेच इम्रानने डायरेक्शनवर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले होते.