दोन महिने काम बंद असल्याचा फटका
पुणे – शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून भामा- आसखेड धरणातून 2.62 टीएमसी पाणी घेण्यात येणार आहे. या योजनेचे गेले दोन महिने बंद असलेले काम शुक्रवारी पुन्हा सुरू झाले असले तरी, हे पाणी पुणेकरांना मिळण्यास फेब्रुवारी 2020 उजाडणार आहे. या योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झाले असले तरी उर्वरीत 10 टक्के कामात सुमारे दीड किलोमीटरची जलवाहिनी टाकणे, जॅकवेलचे काम पूर्ण करणे तसेच धरणातील पाणी उचलण्यासाठी आवश्यक असलेली खोदाई करण्यास आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यात या योजनेच्या चाचणीसाठी सुमारे 1 ते 2 महिने जाणार आहेत. त्यामुळे हा विलंब होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
महापालिकेकडून 2012 मध्ये या योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, गेल्या सहा-सात वर्षांत जवळपास साडेतीन वर्षे शेतकऱ्यांची आंदोलनामुळे हे काम बंद पडले असल्याने प्रशासनास 2015 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असलेला हा प्रकल्प 2019 अर्ध्यावर आला तरी पूर्ण झालेला नाही. त्यातच, शेवटच्या टप्प्यात काम आलेले असतानाच शेतकरी अधिकच आक्रमक झाल्याने वारंवार काम बंद असल्याने आता थेट राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या मागवित हे काम सुरू करण्यात आले असून ज्या ठिकाणी हे काम सुरू आहे त्या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वीचे हे दोन महिने काम बंद असल्याने प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. हे काम पालिकेकडून ऑक्टोबर-2019 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, आता दोन महिने वाया गेले असून पावसाळ्यात काम करणे जिकिरीचे बनते, ही बाब लक्षात घेऊन आता प्रशासनाने फेब्रुवारी 2020 मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन केले असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
वितरण यंत्रणा तयार
या योजनेचे पाणी शहराच्या पूर्व भागासाठी देण्यात येणार असल्याने महापालिका प्रशासनाने पाणी वितरणाचे नियोजन पूर्ण केले आहे. हे पाणी महापालिकेकडून येरवड्यापासून ते खराडीपर्यंत मुळा-मुठा नदीच्या डाव्या बाजूच्या भागाला देण्यात येणार आहे. त्यात लोहगाव, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विश्रांतवाडी, विमाननगर, कळस, धानोरी, कल्याणीनगर, शास्त्रीनगर या भागांचा समावेश आहे. त्यासाठी प्रशासनाने सहा नवीन पाण्याच्या टाक्या प्रस्तावित केल्या असून त्यातील 5 टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे तर आधीच्या 22 टाक्या असून सुमारे 5 लाख लोकसंख्येला हे पाणी देण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.