बाधितांना महापालिकेच्या नोटीसा; रस्त्याला विरोध होण्याची शक्यता
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या उच्च क्षमता वर्तुळाकर मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्याची संयुक्त मोजणी सुरू झाल्यानंतर महापालिकेकडून या रस्त्यातील बाधितांना नोटीसा बजाविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. हा रस्ता सुरू होतो त्या बोपोडीतील अनेक इमारती, दुकाने आणि घरे बाधीत होत त्यांना महापालिकेच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे धस्तावलेल्या नागरिकांना शुक्रवारी महापालिकेत गर्दी केली होती. त्यामुळे प्रशासनाकडून या नागरिकांची बैठक घेऊन त्यांना या मार्गाची माहिती देण्यात आली. मात्र, यावेळी धस्तावलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या या प्रकल्पास विरोध केल्याचे पहायला मिळाले. तर भविष्यात हा विरोध आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यात 36 किमीचा एचसीएमटीआर मार्ग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. प्रशासनाने आता या मार्गाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. हा संपुर्ण मार्ग इलिव्हेटेड असून अस्तित्वातील रस्त्यावरुनच त्याची आखणी करण्यात आली आहे. या रस्त्याची रुंदी 24 मीटर (अंदाजे 80 फूट) इतकी आहे. त्यानुसार प्रशासनाने या रस्त्याची मार्ग (अलाईमेंट) निश्चित केली आहे. त्यात बोपोडीतील भाऊपाटील रस्त्यावरुन आंबेडकर चौक पुढे विद्यापीठ परिसरातून विद्यापीठ गेटसमोरुन सेनापती बापट रस्त्यावरुन हा मार्ग पुढे जाणार आहे. त्यात बापोडी परिसरातील जवळपास शंभरहून अधिक मिळकती या मार्गामुळे अडचणीत आल्या आहेत. या मिळकती पालिकेला हस्तांतरीत करण्यासाठी बांधकाम विभागाने या मिळकतकरधारकांना नोटीसा बजाविल्या आहेत. त्याबाबत शुक्रवारी पालिकेत या मिळकतकरधारकांच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. त्यात या मार्गाचे सादरीकरण आणि त्याची प्रत्यक्ष आखणीची रेषा दाखवित नागरीकांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आम्हाला परवानगी दिलीच कशाला
या मार्गाच्या आखणीत बोडीतील अनेक संपुर्ण इमारती, दुकाने, घरे, कार्यालय बाधित होत असल्याचे दिसून आले.त्यातील काही इमारतींना एक-दोन वर्षापुर्वी बांधण्यात आल्या आहेत. जर हा रस्ता प्रस्तावित होता तर मग आमच्या इमारतींना परवानगीच कशाला द्यायची असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. तर अनेकांनी या मार्गात बदल करावा अशी भुमिका मांडली. त्यावर प्रशासनाने प्रत्येकाने आपले म्हणने लेखी स्वरुपात मांडावे असे स्पष्ट केले. त्यानंतर ही बैठक आटोपती घेण्यात आली. मात्र, प्रशासनाने दिलेल्या माहितीवर नागरीक नाराज असल्याचे चित्र असून आम्ही एकत्र येऊन याला विरोध करणार असल्याचे काही नागरिकांनी बैठकीनंतर सांगितले.