पवार, स्टॅलिन यांच्याबरोबरच मायावती, अखिलेश यांना बैठकीसाठी निमंत्रण
नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना एकत्र करण्यासाठी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी पुढे सरसावल्या आहेत. निकालाच्या दिवशीच (23 मे) विरोधकांची दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण सोनियांनी बहुतांश विरोधी पक्षांच्या नेत्यांना पाठवले आहे.
लोकसभा निवडणुकीत कुणाच्याच पारड्यात बहुमत न जाता त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास सरकार स्थापनेवरून मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तशा स्थितीत गाफील न राहता तातडीने पाऊले उचलण्यासाठी विरोधकांनी सज्ज राहावे, असा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. निकालाच्या दिवशीच विरोधकांनी एकत्र असावे, असे कॉंग्रेसला वाटते. त्यातून आतापर्यंत निवडणूक काळात लो-प्रोफाईल राहिलेल्या सोनियांनी बैठकीच्या आयोजनाची सुत्रे हाती घेतली आहेत.
बैठकीची निमंत्रण देणारी पत्रं त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे एम.के.स्टॅलिन, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू आदींना पाठवली आहेत. उत्तरप्रदेशात कॉंग्रेसला दूर ठेऊन महाआघाडी स्थापन करणाऱ्या मायावती आणि अखिलेश यादव यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. तेलंगण राष्ट्र समिती, बिजद आणि वायएसआर कॉंग्रेस या पक्षांपर्यंतही कॉंग्रेस पोहचल्याचे समजते.
विरोधकांना एकत्र करण्याच्या प्रयत्नातील प्रमुख अडसर पंतप्रधानपद ठरू शकते. मात्र, इतरांना ते देण्याची तयारी असल्याचे संकेत कॉंग्रेसकडून आधीच देण्यात आले आहेत. त्यातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे याला कॉंग्रेसचे पहिले प्राधान्य असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, मायावती आणि अखिलेश यांच्याबरोबरच ममता बॅनर्जी विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याचे सुत्रांकडून सूचित केले जात आहे.