मसूर –कारखाना कार्यक्षेत्रातील मौजे गायकवाडवाडी, घोलपवाडी व गोसावेवाडी ता. कराड या गावांकरीता महाराष्ट्र शासनाच्या पाणी टंचाई 2019 कार्यक्रमांतर्गत 24 हजार लिटर्स क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरसाठी मोफत पाणी भरून देण्याची सुविधा सह्याद्रि कारखान्याने कार्यस्थळावर उपलब्ध करून दिली.
सह्याद्री कारखान्याचे प्रेरक स्व. यशवंतरावजी चव्हाण आणि कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी. डी. पाटील यांच्या विचारधारेवर चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज सुरू आहे. कारखान्याच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार पोकलॅन मशीन व जेसीबी मशीन कारखाना कार्यक्षेत्रातील दुष्काळी गावातील जलसंधारणाच्या कामासाठी प्रतिवर्षी संबंधित गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाते. शिवाय यापूर्वी दुष्काळी गावांतील जनावरांसाठी ओला चारा, तसेच गावोगावी ग्रामस्थांकरीता पिण्याचे पाणी साठवणुकीसाठी प्लॅस्टिकच्या टाक्या पुरविल्या आहेत.
सदर पिण्याच्या पाण्याचा टॅंकर भरून देतेवेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, फायनान्शिअल ऍडव्हायझर एच. टी. देसाई, चीफ अकौन्टंट जी. व्ही. पिसाळ, कामगार व कल्याण अधिकारी एन. आर. जाधव, शेती अधिकारी एम. ए. पाटील, पर्यावरण इंजिनिअर एच. जे. माने, जनसंपर्क अधिकारी व्ही. जे. शेलार, अनिल पाटील, यशवंतनगर ग्रामपंचायतीचे सदस्य विकास चव्हाण व कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.