आता प्रति जनावर 100 रुपये अनुदान मिळणार
मुंबई – चारा छावण्यातील जनावरांच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून प्रति जनावर आता 90 रुपयांऐवजी 100 रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजना उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चारा छावण्यांतील जनावरांसाठी लागणाऱ्या वैरणाची खरेदी व त्यावरील वाहतुकीचा खर्च तसेच मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिवस 18 किलो हिरवा चारा व आठवड्यातून तीन दिवस 1 किलो पशुखाद्य आणि लहान जनावरांसाठी 9 किलो हिरवा चारा व एक किलो पशुखाद्य देण्यात येत असल्यामुळे चारा छावण्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये प्रति जनावर 10 रुपयांची वाढ करून आता मोठ्या जनावरांसाठी 100 रुपये, तर लहान जनावरांसाठी 50 रुपये दर देण्यात येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात दुष्काळ निवारणासंबंधीच्या उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती, चारा छावणी, पाणीपुरवठा, रोहयो आदींचा आढावा घेण्यात आला. यावेळी समितीचे सदस्य जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल, पदुम मंत्री महादेव जानकर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, सध्या राज्यात 1417 चारा छावण्या सुरू आहेत. त्यामध्ये 9 लाख 39 हजार 372 पशुधन आहे. या पशुधनांसाठी मोठ्या जनावरांना प्रतिदिवस 18 किलो हिरवा चारा व आठवड्यातून तीन दिवस 1 किलो पशुखाद्य आणि लहान जनावरांना 9 किलो हिरवा चारा व 1 किलो पशुखाद्य देण्यात येते. पशुधनासाठी पाणी आणणे, लांब अंतरावरून चारा आणणे यासाठी वाहतूक खर्च वाढत असल्यामुळे चारा छावणी चालकांना देण्यात येणाऱ्या अनुदानात दहा रुपये वाढ करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे मोठ्या जनावरांना 70 रुपये, तर लहान जनावरांना 30 रुपये अनुदान आहे. मात्र, राज्यातील परिस्थिती पाहून वाढीव अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागासाठी 111 कोटी, पुणे विभागासाठी 4 कोटी व नाशिक विभागासाठी 47 कोटी निधी वितरीत करण्यात आले आहेत.