पोलीस खात्यात तपासात होत आहे भेदभाव
रवींद्र कदम/ नगर: गेल्या पंधरा दिवसांत नगर जिल्ह्यातीलत विविध पोलीस ठाण्यांत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत. परंतु पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या एका अधिकाऱ्यास धक्काबुक्की केल्याल्या आरोपींना पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतले गेले. अधिकाऱ्यांवरील हल्ल्याची तत्काळ दखल प्रशासन घेते. परंतु कर्मचाऱ्यांवरील झालेल्या हल्ल्याची प्रशासन दखल घेत नसल्याचे दिसत आहे. कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यातील आरोपी अद्याप ही मोकाट असून, त्यांच्यावर कधी कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाविषयी नागरिकांचा विश्वास कमी होत असून, खात्याअंतर्गतच भेदभाव होत असून सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कायमच टीकेचे धनी असलेल्या शहर वाहतूक पोलिसांना अनेक नागरिकांना तोंड द्यावे लागते. यामध्ये त्यांना अरेरावीची भाषा केली जाते. परंतु याकडे प्रशासन गांभीर्यांने लक्ष देत नाही. परंतु आधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात संबंधित प्रशासन तत्काळ दखल घेऊन कारवाई करते, हे जगजाहीर आहे. परंतु असे हल्ले कर्मचाऱ्यांवर झाल्यास त्यांची दखल मात्र घेतली जात नाही.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पोलीस प्रशासनही हतबल झाले असून, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. चोऱ्या, मारहाण, दरोड्यांसह अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. नगर शहरासह राहुरी, संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदा, जामखेड, श्रीरामपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक तसेच सर्रास अनेक ठिकाणी अवैध दारू, जुगार अड्डे खुलेआम सुरु आहेत. यावर वचक बसण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्मचारी कारवाई करता. परंतु याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. त्यांच्यावर हल्ले होतात. मात्र पोलीस खात्याकडूनच त्याचा तपास वेळेत लागत नाही, ही शोकांतिका आहे. अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा तपास काही तासांत लागतो व आरोपींना अटकही होते. मात्र कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यात आरोपी मात्र सापडत नाहीत.
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहन होते. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याअंर्तगत गुन्हा दाखल असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला तलवारीने मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. तसेच नेवासा येथील दंगलीत पोलीस गंभीर जखमी झाला होता. परंतु सावेडी येथे पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यास धक्का बुक्की केल्याल्या आरोपींना लगेच अटक होते. अशीच दक्षता अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही घ्यावी अशी मागणी होत आहे.