बाजार घटकात चर्चा : कारवाई होत नसल्याने संख्येत वाढ
पुणे – मार्केटयार्डात पुन्हा अतिक्रमण वाढत आहे. नव्याने टपऱ्या थाटल्या जात आहेत. मागील आठवड्यात बाजारात पडलेल्या टपऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांची संख्या वाढत आहे. गणपती मंदिरालगत पडलेली टपरी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे. त्यामुळे जर समिती प्रशासनाच्या आशिर्वादाने आणि कर्मचाऱ्यांच्याच टपऱ्या पडत असल्यास त्यावर कारवाई कोण करणार असा सवाल उपस्थित झाला आहे.
मार्केटयार्डात विविध विभागांत रस्त्यालगत टपऱ्या थाटल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शेतमालाची वाहने गाळ्यांवर उशीरा पोहोचून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. तर, हमालांना शेतमालाची ने-आण करताना मोठी कसरत करावी लागते. त्याचा त्रास बाजारात येणाऱ्या खरेदीदार, नागरिकांनाही सहन करावा लागतो. अशावेळी शेतकरी, बाजार घटकांचे हित जोपासण्याऐवजी बाजार समिती अवैध बांधकामे आणि अतिक्रमणाना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.
बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ असताना काही संचालकांनी आर्थिक व्यवहारातून टपऱ्या टाकल्या होत्या. प्रशासकांच्या काळात त्या हटविण्यात आल्या. बाजार समितीत दिवसेंदिवस शेतमालाची आवक वाढत आहे. प्रशासकीय संचालक मंडळातील काही संचालकांनी आर्थिक व्यवहारातून टाकलेल्या टपऱ्या हटविल्यानंतर आता प्रशासकांच्या काळात गणेश मंदिरालगत पक्के बांधकाम करून टपरी थाटली आहे. या टपरीला पाणी आणि विजेचा जोड दिला आहे. ही टपरी बाजार समितीच्या कर्मचाऱ्याची असल्याचे टपरीचालक सांगत आहे. जर बाजारातील अतिक्रमणे ही कर्मचाऱ्यांची असल्यास त्यावर कारवाई कोण करणार असा सवाल यानिमित्त उपस्थित झाला आहे.
बाजार आवारातील चर्चेत असलेली ती टपरी पूर्वी 1 क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ होती. ती हटविण्यात आली होती. त्यावेळी अनधिकृत असलेल्या टपऱ्यांचे पुनर्वसन करण्याबाबत ठरले होते. त्यानुसार विभागप्रमुखांना सांगून पुनर्वसन केले आहे. माझ्या गाडीच्या चालकाची अथवा बाजार समितीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याची ती नसून, रेकॉर्डवरील नावानेच तिचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
– बी.जे.देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे