नगर: महापालिका स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख यांच्या प्रभागातील कारचीनगर परिसरातील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून पाणी, वीज, रस्ते, गटारी या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत वारंवार महापालिकेकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने आता न्याय कोणाकडे मागायचा असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. कराचीवालानगर परिसरात उच्चभ्रू नागरिकांची वस्ती असून दोन महिन्यांपासून या परिसरात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना बोअरवेलचे दूषित पाणी प्यावे लागत आहे.
पाणी, रस्ते, वीज या मुलभूत सुविधांबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे प्रभाग अधिकारी आणि केअरटेकर यांच्याकडे लेखी निवेदन देऊन दोन महिन्यांपासून पाठपुरावा केला, मात्र त्याबाबत महापालिकेने अद्यापही कोणतीच दखल घेतलेली नाही. या परिसरातील नागरिक पाणीपट्टी, घरपट्टी नियमित भरत असतानाही त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळत नाही. या भागातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील दोन वर्षांपासून या रस्त्याची पुरती वाट लागलेली असून वाहनधारकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे पायी चालणेही नागरीकांना अवघड झाले आहे.
रस्त्यांबरोबरच नाली, गटारीचीही दुरावस्था झाली आहे. गटारी उघड्या असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे.त्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. उघड्या गटारी, डासांचा प्रदुर्भाव,साफसफाईचा अभाव, कचऱ्याचे साम्राज्य यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्वच्छतेमुळे परिसरात डुकरांचा सुळसुळाट झाला असून नागरिक त्रस्त झाले आहे.
कराचीवालानगर परिसरात वीज नसल्याने रात्री काळोखाचे साम्राज्य असते. रस्त्यावर रात्री अंधार राहत असल्याने मुले, वयोवृद्ध, नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. राधाबाई काळे महाविद्यालयालगत रस्ता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गटारी उघड्या आहे. आतापर्यंत या गटारीत पडून अनेक विद्यार्थिनींचे अपघातही झाले आहेत. या मूलभूत सुविधा तातडीने मिळण्याबाबत परिसरातील योगेश बजाज, शैलेश जाजू, परेश बजाज, सुशील जाजू, परेश बिहाणी, महेश बिहाणी, जावेद शेख यांच्यासह नागरिकांनी वारंवार लेखी, तोंडी पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. प्रशासन आमच्या समस्यांची दखल घेणार नसेल तर आता न्याय मागण्यासाठी कोणाकडे जायचे असा सवाल नागरिक केला आहे. विशेष म्हणजे कराचीवालानगर परिसर हा महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांच्या प्रभागात येतो. या प्रभागाचे नगरसेवक मनपाच्या प्रमुख विषय समितीचे सभापती असतानाही नागरिकांना मात्र मुलभूत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.