ठेकेदाराने बजाविली पालिकेला नोटीस; 125 कोटी जाणार पाण्यात
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी बंद पाईपलाईन योजना गुंडाळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेच्या कामातून आपल्याला मुक्त करावे, अशी नोटीसच जलवाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने बजाविली आहे. तब्बल 8 वर्षांपासून ही योजना “जैसे थे’ असल्याने तसेच शिवसेना-भाजपा नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे या योजनेचे तीन-तेरा होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे भविष्यात पिंपरी-चिंचवड शहरवासियांवर पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या 2031 च्या लोकसंख्येचा विचार करून पवना धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची योजना तात्कालीन सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीने घेतली होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी स्वत: पुढाकार घेतला होता. मात्र मावळातील शेतकऱ्यांनी या योजनेला विरोध दर्शवित सन 2011 साली केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनात तीन शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यूही झाला होता. या घटनेनंतर ही योजना वादात अडकली होती तर काहीजण न्यायालयात गेले होते. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या योजनेला “जैसे थे’चे आदेश दिले होते. दरम्यानच्या काळात सन 2014 साली आघाडीचे सरकार जावून युतीचे सरकार आल्यानंतर या योजनेबाबत कोणतीच आजपर्यंत हालचाल झाली नाही तसेच शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी साधी बैठकही झालेली नाही. राज्य शासनाने या योजनेबाबत पुढाकार घेण्याची गरज होती मात्र, योजनेच्या निर्णयप्रक्रियेत शासनाचे आजपर्यंतचे धोरणच उदासिन राहिले आहे.
या योजनेचे काम करण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराला 125 कोटी रुपये अदा केले होते. तसेच ठेकेदाराने कामही सुरू केले होते. आता ही रक्कमही पाण्यात जाणार आहे. शासनाची स्थगिती आणि न्यायालयीन प्रक्रिया यामुळे सलग 8 वर्षे ही योजना बंद राहिल्याने ही योजना राबवित असलेल्या मे एनसीसी, एसएमसी, इंदू (जे.व्ही) या ठेकेदार कंपनीने महापालिकेला नुकतीच नोटीस काम सुरू होणार नसेल तर आपला हिशोक करून काम बंद करण्याची परवानगी मागितली आहे. याबाबत महापालिकेने अद्याप ठेकेदाराला कोणतेच उत्तर दिले नसले तरी ही योजना राबविण्याच्या मानसिकतेत नसलेले सत्ताधारी ही योजना गुंडाळण्याचीच अधिक शक्यता आहे.
ही योजना सुरू झाल्यापासून भाजपा आणि शिवसेनेने नेहमीच दुटप्पी भूमिका घेतल्याचे वारंवार समोर आले आहे. मावळ तालुक्यात भाजपाचे वर्चस्व असून या योजनेला विरोध करण्याची भूमिका भाजपाच्या मावळमधील नेत्यांची आजही कायम आहे. त्यामुळे युतीच्या नेत्यांची गोची झाली आहे. शहराच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार असल्याने या योजनेचे शहरवासियांच्या दृष्टीने प्रचंड महत्त्व आहे मात्र मावळातील भाजपानेत्यांचा विरोध असल्याने मावळात गेल्यानंतर विरोधी आणि पिंपरी-चिंचवड शहरात बंद पाईपलाईनच्या बाजूने युतीच्या नेत्यांनी भूमिका घेतली आहे. सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सेना-भाजपा युतीचेच सरकार असल्याने या योजनेचे भविष्य अधांतरी असून ही योजना गुंडाळली जाण्याचीच शक्यता बळावली आहे.
प्रकल्प शहरवासियांच्या दृष्टीने महत्त्वाचा
शहराला 24 तास पाणीपुरवठा करणे आणि 2031 ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन करणे ही मुख्य कारणे या योजनेपाठीमागे होती. मात्र आता ही योजना बंद बस्त्यात असतानाच ठेकेदार कंपनीने घेतलेली भूमिका आणि सत्ताधाऱ्यांची अनास्था यामुळे हा प्रकल्प अडचणीत सापडला आहे. शहरवासियांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ही योजना गुंडाळली गेल्यास शहरावर भविष्यात पाणीटंचाईचे संकट नक्कीच ओढवणार हे निश्चित आहे. सध्याचे सत्ताधारी पाण्यासाठी आता नविन काय योजना आणतात की शहराला पाणीटंचाईच्या संकटात ढकलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.