नवी दिल्ली – ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेमध्ये चर्च आणि हॉटेल्सवर घडवून आणण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यांची घटना ताजी आहे. आतापर्यंत या क्रूर दहशतवादी हल्ल्यामध्ये २५०हून अधिक नागरिक व पर्यटकांनी जीव गमावला असल्याची माहिती असून याच पार्श्ववभूमीवर आज भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय नागरिकांना श्रीलंकेला प्रवास करण्याची योजना असल्यास ती शक्यतो टाळावी असा सल्ला देण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सल्ल्यामध्ये “श्रीलंकेमध्ये नुकताच दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला असून या हल्ल्यांनंतर श्रीलंकेतील वातावरण तणावाचे असल्याने शक्यतो भारतीयांनी श्रीलंकेचा प्रवास टाळावा. जर श्रीलंकेला प्रवास करणे अनिवार्य असेल तर ते मदतीसाठी कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्त, कँडीतील सहाय्यक उच्चायोग, अथवा हंबांतोटा आणि जाफना येथील वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधू शकतात” असं सांगण्यात आलं आहे.