खेड तालुक्यातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक
राजगुरुनगर – “खासदार आढळरावांना मत म्हणजेच मोदींना मत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनविण्यासाठी संपूर्ण देशासह राज्यातील भाजपचे कार्यकर्ते सरसावले आहेत. या बैठकीत शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना खेडसह लगतच्या तालुक्यांतून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा ठराव संमत करण्यात आला’ असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे नेते शरद बुट्टे पाटील यांनी दिली.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे संपर्कप्रमुख धर्मेन्द्र खांडरे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक नुकतीच राजगुरुनगर येथे संपन्न झाली, त्यावेळी शरद बुट्टे पाटील बोलत होते. याप्रसंगी तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष, शिवाजी मांदळे, बापूसाहेब थिगळे, कालिदास वाडेकर, संदीप रासकर, पांडुरंग ठाकूर, पांडुरंग वहिले, चांगदेव शिवेकर, राजनभाई परदेशी, ऍड. उमापसाहेब, अमृत शेवकरी, पप्पू तापकीर, संदीप सोमवंशी, राजगुरुनगर व आळंदीचे उपनगराध्यक्ष, चाकणसह तीनही नगरपरिषदेतील सर्व नगरसेवक, शक्ती केंद्रप्रमुख व 164 ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
धर्मेन्द्रजी खांडरे म्हणाले की, केंद्रात भाजपप्रणीत एनडीएचे सरकार आणण्यासाठी प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे. पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या सोबतीला शिवनेरीचा खंदा समर्थक म्हणून शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप-शिवसंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लोकसभेत पाठवायचे आहे, असे भाजपचे संपर्कप्रमुख धर्मेन्द्र खांडरे यांनी सांगितले. खांडरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी खासदार आढळराव पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा विडाच जणू या बैठकीत उचलला आहे.
डॉ. अमोल कोल्हे स्वत:च्या स्वार्थासाठी शिवसेनेशी प्रतारणा करून राष्ट्रवादीत गेले. स्वार्थासाठी तत्त्व, पक्ष अन निष्ठेचे सरड्यासारखे रंग बदलणारे कोल्हे यांना सच्चा मावळाही बनता आले नाही. त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता धडा शिकवेल.
– अतुल देशमुख, खेड तालुका अधक्ष, भाजप