महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा नावीन्यपूर्ण समाजहितोपयोगी उपक्रम
सातारा – समाजप्रबोधनासह समाजसेवेचा अखंड समाजहितोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या रायगड जिल्ह्यातील रेवदंडा (ता. अलिबाग) येथील महाराष्ट्रभूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छतादूत, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, रायगडभूषण सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी संपूर्ण जिल्ह्यात सकाळी सात ते नऊ या वेळेत जिल्ह्यातील 80 स्मशानभूमी व दफनभूमीत स्वच्छता अभियान राबवून एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा आदर्श समाजासमोर उभा केला आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत राबविण्यात आलेल्या या स्मशानभूमी स्वच्छता अभियानांतर्गत तब्बल 2554 सदस्यांनी 61 टन कचरा गोळा करून त्याची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमातून मिळालेला स्वच्छतेचा संदेश प्रत्येक नागरिकांनी अंगीकारल्यास सर्वांना आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत होणार आहे.
रविवारी संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या स्मशानभूमी व दफनभूमी स्वच्छता अभियान या अनोख्या उपक्रमाची त्यात आणखी भर पडली असून केवळ समाजहिताचाच विचार करणाऱ्या प्रतिष्ठानमार्फत सातारा जिल्ह्यात प्रथमतःच हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला गेला. दरम्यान जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, कराड, पाटण, वाई, माण, खटाव, जावली तसेच सोलापूर जिल्ह्यातील पिलीव आदी ठिकाणी एकूण 80 स्मशानभूमी व दफनभूमीत स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले. दरम्यान स्मशानभूमीच्या आसपासचा देखील परिसर स्वच्छ करण्यात आला. स्मशानभूमींची स्वच्छता करण्याचा संकल्प जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे. यामुळे सर्व स्तरातुन प्रतिष्ठानचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून करण्यात आली होती. तसेच मास्क व हातमोजे प्रतिष्ठानकडून पुरविण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी खराटे, दांताळे, घमेली, खोरे , झाडू, पंजे आदी आवश्यक साहित्य स्वत: आणून स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पाडले.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गरीब – गरजूंना शालेय साहित्य वाटप, मूक- बधीर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप, रकतदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, बेरोजगार युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वाहन परवाना काढून नोकरीची संधी, प्रौढ शिक्षण, पाणपोई, प्रवाशांसाठी बस थांबा, तलावातील गाळ काढणे, तैलचित्रातून समाजप्रबोधन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान, जलपुनर्भरण, निर्माल्यापासून खत निर्मिती असे अनेकविध उपक्रम प्रतिष्ठानमार्फत आजपर्यंत यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.