नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याविषयी विरोधी भावना बाळगून असल्याचे दक्षिण भारतातील जनतेला वाटते. देशाशी संबंधित निर्णयांमध्ये आपल्याला सामावून घेतले जात नसल्याचे त्यांना वाटते. त्यामुळेच दक्षिण भारतीयांच्या पाठिशी असल्याचा संदेश देण्यासाठी केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
उत्तरप्रदेशातील अमेठी हा राहुल यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. यावेळी अमेठीबरोबरच वायनाडमधूनही रिंगणात उतरण्याचा निर्णय राहुल यांनी घेतला आहे. दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय चर्चेचा विषय बनला आहे. त्यापार्श्वभूमीवर, येथे पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी वायनाडमधून रिंगणात उतरण्याविषयीची भूमिका स्पष्ट केली. वायनाडमधून निवडणूक लढवण्याच्या राहुल यांच्या निर्णयावर डाव्या पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राहुल यांच्या निर्णयामुळे कॉंग्रेसला भाजपऐवजी आमच्याशी लढायचे असल्याचे स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रिया डाव्या पक्षांकडून देण्यात आली. तर अमेठीचे मतदार हिशेब मागतील अशी भीती राहुल यांना वाटते. त्यातून त्यांनी केरळला पळ काढला, अशी टिप्पणी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली.