न्यूयॉर्क – २१ व्या शतकाच्या संदर्भात अनेक तज्ज्ञांनी मोठ्या भविष्यवाणी केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हे शतक आशियाच्या वर्चस्वाचे राहणार आहे. येणाऱ्या काळात आशियाई राष्ट्रे अमेरिका आणि युरोप यांच्या तुलनेत अधिक वेगाने पुढे गेलेली दिसतील. आशियाई देशांच्या प्रगतीचा हा वेग पाहता २०५० पर्यंत आशियातील अनेक छोटी छोटी राष्ट्रे एवढी संपन्न झालेली असतील की ती जगातल्या आजच्या सर्व बड्या राष्ट्रांना मागे टाकतील. (In 2050, China will be a ‘superpower’, India will be second)
२०५० मध्ये जगाची अर्थव्यवस्था केवढी असेल आणि कोणती सुपरपॉवर अर्थात महासत्ता जगावर राज्य करेल याबाबत प्राइस वॉटरहाउस कूपर्स इंटरनॅशनल लिमिटेड अर्थात पीडब्लूसीने वर्ल्ड इन २०५० नावाचा एक अहवाल तयार केला आहे. त्यात असे म्हटले आहे की, आता जे देश विकसनशील देश म्हणून ओळखले जातात ते २०५० मध्ये विकसित झालेले असतील.
वास्तविक पीडब्लूसीने २०१७ मध्येच हा अहवाल जारी केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार २०५० पर्यंत जगाची अर्थव्यवस्था दुप्पट झालेली असेल व या वाढीत सगळ्यांत जास्त वाटा हा विकसनशील राष्ट्रांचा असेल. अजून २६ वर्षांनंतर जागतिक अर्थव्यवस्थेत १३० टक्के वाढ झालेली असेल.
इ ७ हा विकसनशील देशांचा एक गट आहे तर जी ७ हा विकसित देशांचा गट आहे. विकसनशील देशांच्या गटात भारत, चीन, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान, व्हिएतनाम आणि नायजेरिया आदी देशांचा समावेश आहे. तर जी ७ मध्ये अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा आणि इटली यांचा समावेश आहे. इ ७ देशांची अर्थव्यवस्था जी ७ देशांच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने वाढेल असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. १९९५ पासून इ ७ देशांची अर्थव्यवस्था जी ७ देशांच्या तुलनेत निम्मे राहीली आहे. येथून पुढच्या काळात हेच चित्र उलटे झाल्याचे दिसेल.
अमेरिका तिसऱ्या स्थानावर जाणार –
आज अमेरिका जगातील सगळ्यांत मोठी आर्थिक महासत्ता आहे. तथापि, २०५० पर्यंत हा देश तिसऱ्या तर चीन पहिल्या स्थानावर आला असेल. जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेत चीनचा आजचा वाटा १८ टक्के आहे तो २० टक्क्यांपर्यंत आलेला असेल. जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये सध्या समावेश असलेले जपान आणि जर्मनी हे देश नंतर यादीत नसतील.
पीडब्लूसीच्या अहवालानुसार २०५० मध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला असेल. सध्या भारताची जागतिक अर्थव्यस्थेतील भागिदारी ७ टक्के आहे ती १५ टक्क्यांपर्यंत पोहोचलेली असेल. भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल पहायला मिळेल. आज भारत पाचव्या स्थानावर आहे, भविष्यात इंडोनेशिया चौथ्या तर ब्राझील पाचव्या स्थानावर असेल.
सीईबीआरचा वेगळाच दावा –
सेंटर फॉर इकोनॉमिक्स ॲंड बिझनेस रिसर्चने (सीईबीआर) मात्र चीन २०२८ पर्यंत तर भारत २०३५ पर्यंतच अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर पोहोचतील असे म्हटले आहे. रूपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे भारत आता पुन्हा ब्रिटनच्या मागे पडू शकतो ;पण ते अल्पकाळासाठी असेल व भारत दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था या स्थानावर परत झेप घेईल असा दावा करण्यात आला आहे. जागतिक पर्यावरण बदलाचाही जगाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव वाढत चालला असल्याचे नमूद करतनाच २०३५ पर्यंत कच्च्या तेलाच्या किमती ३० डॉलरच्या आत आलेल्या असतील असेही सांगण्यात येते आहे.