IPL 2024 Suryakumar Yadav : आता IPL 2024 सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व 10 संघ त्यांच्या तयारीत व्यस्त आहेत. त्याचवेळी काही संघांचे स्टार खेळाडू अद्याप तंदुरुस्त नसल्यामुळे त्यांना खेळणे कठीण झाले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या नवीन हंगामापूर्वी सूर्यकुमार यादवच्या तंदुरुस्तीबद्दल मुंबई इंडियन्स चिंतेत आहेत, कारण फलंदाज अद्याप त्याच्या हर्नियाच्या शस्त्रक्रियेतून बरा झाला नाही.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती. या मालिकेदरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. स्पोर्ट्स हर्नियाच्या समस्येमुळे गंभीर जखमी झाल्यामुळे सूर्या जानेवारीपासून क्रिकेटपासून दूर आहे. माध्यमातील वृत्तानुसार आयपीएल 2024 स्पर्धेतील तो सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. दरम्यान हेच कारण असावं आणि त्यामुळेच त्याने ही स्टोरी शेअर केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सूर्यकुमार यादवच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून तर्क-वितर्कांना उधाण…
मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध आहे आणि सूर्याच्या ताज्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे चाहत्यांना या मोसमात त्याच्या उपलब्धतेबद्दल चिंता वाटू लागली आहे. त्याने मंगळवारी एक ‘ब्रोकन हार्ट’ इमोजी पोस्ट केली आणि चाहत्यांनी त्याच्या भविष्याबद्दल अंदाज, तर्क-वितर्क लावायला सुरूवात केली.
WPL 2024 : चॅम्पियन आरसीबीवर पडला पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
मार्क बाउचरने सूर्याच्या दुखापतीबाबत दिली माहिती…
एमआयचे नवे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी सोमवारी संघाच्या प्री-सीझन पत्रकार परिषदेत सूर्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही बीसीसीआयकडून सूर्यकुमारबद्दलच्या अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहोत. फिटनेस आव्हाने ही कायमची समस्या असली तरी, आम्हाला आमच्या जागतिक दर्जाच्या वैद्यकीय संघावर विश्वास आहे.” बाउचरने सोमवारी पत्रकारांना सांगितले की, “फिटनेसच्या चिंतेमुळे आम्हाला काही अडथळ्यांना सामोरे जावे लागेल, परंतु खेळाच्या क्षेत्रात दृढनिश्चय ठेवावा लागेल.
एमआयला मोठा धक्का
सूर्यकुमारने आपला शेवटचा क्रिकेट सामना 14 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला, जो T20 सामना होता. त्यानंतर डीवाय पाटील टी-20 चषकातही तो सहभागी होऊ शकला नाही. जर सूर्या आयपीएल लीगसाठी वेळेत बरा झाला नाही तर मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसेल. कारण त्याने आयपीएलमधील 139 टी-20 सामन्यांमध्ये 3 हजार 249 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे.