बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार कुटुंब प्रथमच एकाच मंचावर आणि तेही बारामतीच्या बाल्लेकिल्ल्यात. नमो रोजगार मेळाव्यानिमित्त विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शनिवारी (दि. 2) ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते; मात्र या दरम्यान बहिण, भाऊ, काकांचा अबोला ठळक दिसून आला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांवर हळूच मिश्कील टिप्पणीही केली. बारामतीत पवार विरुद्ध पवार ही लढत येत्या लोकसभेत पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. त्याचा पहिला अध्याय आजच नमो रोजगार मेळाव्यात राज्याला पाहायला मिळाला.
बारामतीतील नमो मेळाव्याची मागील दोन दिवस भरपूर चर्चा रंगली. शरद पवारांच निमंत्रण पत्रिकेत नाव वगळले होते. त्यानंतर शरद पवारांनी फासे पलटवले आणि थेट गोविंद बागेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जेवणाचे निमंत्रण दिले. सुप्रिया सुळे यांचे नाव पत्रिकेत आधीपासून होते; मात्र त्यांना ऐनवेळी म्हणजेच 48 तासांपूर्वी पत्रिका देण्यात आली. त्यानंतर बारामतीची लोकप्रतिनिधी म्हणून मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करायला जाईन म्हणत सुप्रिया सुळेंनी सगळ्यावर पडदा टाकला.
नमो रोजगार मेळावा हा बारामतीतील विद्याप्रतिष्ठानमध्ये पार पडला. याच विद्या प्रतिष्ठानचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत. या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी या कार्यक्रमात उपस्थित राहू इच्छितो, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी भोजनासाठी येता येणार नसल्याचे पत्र शरद पवारांना पाठवले. या सगळ्या पत्र व्यवहारात रोजगार मेळाव्याची चर्चा मागे पडली आणि राजकीय चर्चा सुरू झाली.
राजकीय टिपण्णी मर्यादित ठेवल्या!
नमो रोजगार मेळाव्याला बड्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वलय प्राप्त झाले. त्यानंतर सगळ्या नेत्यांनी बोलताना आपली भाषा राखली. कायम एकमेकांवर ताशेरे ओढणार्यांनी आज रोजगार मेळाव्याच्या मंचावर एकत्र रोजगारासंदर्भात चर्चा केली. त्यासोबतच राजकीय टिपण्णी करणे मात्र सगळ्यांनी मर्यादित ठेवल्याने हा मेळावा राजकीय आखाडा झाला नाही हे मात्र विशेष ठरले.
पवारांकडून शिंदे सरकारचे कौतुक
या मेळाव्याला शरद पवार आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर शरद पवार काहीतरी राजकीय टिपण्णी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र शरद पवारांनी शिंदे सरकारचे कौतुक केले. देशात बेरोजगारीचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. तरुणांना रोजगार देण्याची गरज आहे. सरकारने तरुणांना रोजगार देण्याची गरज आहे. त्यात सरकार अशा प्रकारचे मेळावे आयोजित केल्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. शिवाय तरुणाच्या रोजगारासाठी राजकारण सोडून एकत्र यायला हवे असेही शरद पवार यांनी सांगून एकप्रकारे सरकारचे कौतुकच केले.
मुख्यमंत्री म्हणाले, राजकारण विरहित सरकार…
आमचे सरकार लोकाभिमुख आहे आणि राजकारण विरहित आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यात म्हटले. त्यानंतर याच सरकारच्या मंचावर शरद पवार आणि सुप्रिया सुळेदेखील उपस्थित आहे. त्यामुळे आम्ही राजकारण विरहित असल्याची प्रचिती आल्याचेही ते म्हणाले. शिवाय राज्याच्या विकासासाठी आम्ही कायम एकत्र काम करू, असे म्हणत त्यांनी तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर भाष्य केले.