पुणे – राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेले आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या.पक्ष हातातून गेल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष दुसऱ्याला दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्याला सोडून दुसऱ्याला पक्ष देण्यात आला. म्हणजे पक्षाचा अध्यक्ष असताना दुसऱ्याला पक्ष दिला गेला हे पहिल्यांदाच घडलं आहे” असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणूक निकालाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले,”माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की, बैलजोडीवर मी पहिली निवडणुकीवर लढलो. आमचं २ वेळा चिन्ह गेलेलं आहे, चिन्ह मर्यादीत काळासाठी उपयुक्त असत.तसेच निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे असं देखील ते यावेळी म्हणाले. जनता या सर्व गोष्टींना समर्थन देणार नाही. सुप्रीम कोर्ट याबाबत योग्य तो निकाल देईल असा आशावाद देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आमची शेवटची निवडणूक आहे म्हणून लोक तुम्हाला भावनिक करतील असं विधान अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं होत. अजित पवारांच्या या आवाहनाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले,”मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही. त्यामुळे भावनात्मक बोलणं योग्य नाही. बारामतीची लोक चोखंदळ आहेत. बारामतीत केलेल्या कामाला लोकांनी पावती दिलेली आहे, असं देखील पवार यांनी यावेळी सांगितलं.