राहुरी – जिल्ह्यासह राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणारी घटना राहुरी तालुक्यात घडली. वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेबाबत वकील संघाकडून पोलीस तपासाबाबत संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे सदर घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे देण्यात आला.
राहुरी येथील ॲड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा आढाव या वकील दाम्पत्याचे २५ जानेवारी रोजी अपहरण कररून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेतील किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग, हर्षल दत्तात्रय ढोकणे, बबन सुनिल मोरे,( रा.उंबरे), भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे, (रा. येवले आखाडा), शुभम संजीत महाडिक (रा. मानोरी,ता.राहुरी) या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन गजाआड केले. या घटनेतील तीन आरोपींनी तात्काळ राहुरी येथील न्यायालयासमोर कबुली जबाब देऊन गुन्हा कबूल केला. यातील किरण दुशिंग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचे दोन गुन्हे तसेच चोरी, दरोडे, घरफोडी, रस्तालूट, जीवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. वकील दाम्पत्याचे हत्याकांड हे २० हजार रुपये फी साठी झाले.
त्यानंतर पाच लाख रूपये खंडणीसाठी झाले, अशी पोलीस प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात आढाव दाम्पत्याचे मृतदेह मिळून आले तेव्हा त्यांच्या अंगावर पाच ते सहा लाखांचे सोने आढळून आले. त्यामुळे सदर हत्याकांड हे फी किंवा खंडणीसाठी झालेले नसून पोलीस प्रशासनाकडून तपास भरकटण्याचे काम सुरू असल्याचा आरोप वकील संघाकडून करण्यात आला होता. २९ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व वकिलांनी राहुरी येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध सभा घेतली.
तसेच पोलिस तपासाबाबत शंका व्यक्त करून सदर तपास सीआयडी कडे द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर अप्पर पोलीस महासंचालकांनी हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या घटनेत आता सखोल व योग्य रितीने तपास होऊन सदर आरोपींना योग्य ती शिक्षा लागून मयत आढाव दाम्पत्याला निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वास राहुरी येथील वकील संघाकडून व्यक्त करण्यात आला.