नवी दिल्ली – संसद सुरक्षाभंग प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी दिल्लीतील सत्र न्यायालयाने पोलिसांना ४५ दिवसांची मुदतवाढ दिली. साधारणपणे तपास यंत्रणांना अटकेच्या दिवसापासून चौकशी पूर्ण करण्यास ३ महिन्यांचा कालावधी मिळतो. मागील वर्षी १३ डिसेंबर या दिवशी संसदेची सुरक्षा भेदण्याची घटना घडली. दोन तरूणांनी लोकसभेच्या गॅलरीतून खाली उडी घेतली.
त्याचवेळी एक तरूणी आणि एक तरूण अशा दोघांनी संसदेबाहेर घोषणाबाजी करत निदर्शने केली. त्या चौघांसह ६ जणांना संबंधित प्रकरणी अटक करण्यात आली. ते सध्या तुरूंगात आहेत. नियमांनुसार निर्धारित ३ महिन्यांच्या कालावधीत चौकशी पूर्ण न झाल्यास आरोपीला जामीन मिळू शकतो.
त्यामुळे चौकशी पूर्ण करण्यासाठी आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची विनंती दिल्ली पोलिसांनी केली होती. मात्र, न्यायालयाने ४५ दिवसांची मुदतवाढ दिली. काही बाबींच्या छाननीसाठी आणखी वेळ लागणार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद करण्यात आले होते. न्यायालयाच्या परवानगीमुळे पोलिसांनी चौकशीसाठी आणखी अवधी मिळाला आहे.