पुणे – राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढला असून, दाट धुके पडत आहे. त्याचा परिणाम विमानसेवेवर होत असून, पुणे विमानतळावरून होणाऱ्या उड्डाण व येणाऱ्या विमानांना बुधवारी (दि. 31) सकाळी बसला. त्यामुळे गुवाहटी, चंदीगड आणि गोव्याला जाणारी व येणारी पाच उड्डाणे रद्द करण्यात आली. तर, काही विमानांना उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून खराब हवामानाचा विमानांच्या उड्डाणवार परिणाम होत आहे. खास करून उत्तरेत दिल्ली व अजूबाजूंच्या विमानतळावर दाट धुके पडल्यामुळे उड्डाणे रद्द होत आहेत. त्याचा परिणाम इतर शहरातील विमान सेवेवर होत आहे. पुण्यातून गुवाहटी व चंदीगडला जाणारी विमाने बुधवारी रद्द झाली. तर, तेथून येणारी देखील विमाने रद्द करण्यात आली. गोव्याहून पुण्याला येणारे विमान रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. पुण्याहून दिल्ली जाणाऱ्या एका विमानाला तब्बल सहा ते सात तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना पुणे विमानतळावर ताटकळत थांबावे लागले.